'रोज टीका आणि चेष्टा होते तरी आम्ही सरकारमध्ये कारण....'

केंद्रात भाजपची सत्ता असताना फडणवीस यांना ही गोष्ट का जमत नाही?

Updated: Oct 18, 2018, 08:57 PM IST
'रोज टीका आणि चेष्टा होते तरी आम्ही सरकारमध्ये कारण....' title=

मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी केंद्र आणि राजातल्या भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. राम मंदिर, महागाई, इंधन दरवाढ आणि दुष्काळ या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी भाजप सरकारवर निशाणा साधला. सरकारमधून तुम्ही कधी बाहेर पडणार असं आम्हाला विचारलं जातं. आम्ही यावरून टीका आणि चेष्टा सहन करतोय ती फक्त हिंदुत्वासाठी करतोय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

सरकारविरोधात मी बोललो तर देशद्रोही, पण आता संघही तेच बोलायला लागला आहे जे शिवसेना बोलत होती. आम्हाला तुम्ही विचारता की तुम्ही सत्तेतून का बाहेर पडत नाही? मग संघाला का विचारत नाही तुम्ही ज्यांना सत्तेवर बसवलं त्यांना बाहेर का काढत नाही? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

५ राज्यांमधल्या निवडणुकीआधी महागाई कमी करण्याचं, पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचं आश्वासन द्या, मी तुमच्या प्रचाराला येईन, असं उद्धव ठाकरेंनी भाजपला सांगितलं. हिंमत असेल तर लोकसभेत 370 कलम रद्द करण्याचा ठराव आणा, शिवसेनेचा त्याला जाहीर पाठिंबा असेल, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी केलं.

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

विष्णूचा अकरावा अवतार असतानाही महागाई रोखता आली नाही

२५ नोव्हेंबरला अयोध्येमध्ये जाणार

हिंदू सणांवरच बंदी का?

देशातला हिंदू जीवंत आहे हे विसरू नका

पेट्रोल-डिझेल दरवाढ एका रात्रीमध्ये, नोटबंदी एका रात्रीमध्ये होते, पण मदत एका रात्रीमध्ये मिळत नाही.

सरकार कुणाचंही येऊ द्या दरवर्षी रावण उभा राहतोय पण आमचं राम मंदिर उभं राहत नाही याची खंत आणि संताप

पंतप्रधान आज धनुष्य बाण घेऊन रावणाचे दहन करतील, पण घरी जाईपर्यंत पेट्रोलचे भाव वाढले असतील

मी एकदा सांगितले काय करणार ते शिवसैनिकांना समजले आहे, त्यावर मी ठाम आहे, स्वबळावर उद्धव ठाकरे ठाम

सध्या देशाच्या पत्रिकेत वक्री झालेले शनी आणि मंगळ आहेत. ते कोण आहेत असा प्रश्न विचारला जाईल पण या वक्री शनी मंगळला सरळ करायची ताकद आमच्यात आहे

2014 ची हवा आता बदलली आहे. 2014 चा उधळलेला वारू शिवसेनेने महाराष्ट्रात रोखला होता

मुख्यमंत्र्यांनी सांगितले आपण अहवाल घेणार. तुम्ही अभ्यास कराल, काथ्याकूट कराल तोपर्यंत काही जीव जातील. कर्नाटक सरकारने दुष्काळ जाहीरही केला. आपल्याकडे कसला कारभार चाललाय. आपल्याकडे दुष्काळ जाहीर करायची वृत्ती आहे का. कर्नाटक सरकार धमक दाखवू शकते, मग फडणवीस का दाखवू शकत नाही

जर दुष्काळाबाबत उपाययोजना झाल्या नाहीत तर शिवसेना सरकारविरोधात रस्त्यावर उतरेल. यांना सगळ्या निवडणुका जिंकायच्या आहेत. हौसिंग सोसायटीची निवडणूक असेल तरीही मुख्यमंत्र्यांचे फोन जातात.

नितीन गडकरी तुम्ही आमचे जुने सहकारी आहात. खोटं बोलणं हे मराठी माणसाला जमत नाही

मंदिर वही बनायेगे पण तारीख नही बतायेंगे. कधी बांधताय ते सांगा? राष्ट्रपतीपदाची निवडणूक येते तेव्हा बाबरी मशीदची केस येते कारण आडवाणी राष्ट्रपती होतील. ज्यांनी बाबरी पाडली त्यांच्या शौर्याचे कौतुक करा

मी राम मंदिरासाठी अयोध्येला जाणार. येत्या 25 नोब्हेंबरला मी अयोध्येला जाणार

15 लाख जसे जुमला होता तसे जाहीर करा राम मंदिर जुमला आहे, असे एकदा जाहीर करा

तुम्ही जगभर फिरताय, पण माझ्या देशाचा. पंतप्रधान अयोध्येत का गेला नाही

तुम्ही मंदिर बांधता की आम्ही बांधू त्याचा फैसला करा. जर तुम्ही बांधत नसाल तर देशातील हिंदू एकत्र करून आम्ही राम मंदिर बांधू.

सरकारमधून कधी बाहेर पडणार असे विचारले जाते, मी चेष्टा, टीका सहन करतोय ते केवळ हिंदुत्वासाठी

उद्या पंतप्रधान शिर्डीत येतायत, ज् दुष्काळग्रस्त भागाला भेट द्या, नुसत्या थापा मारू नका

निवडणूक जिंकण्यासाठी जी तुमची खलबंत चालतात ती पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करण्यासाठी का चालत नाहीत

मराठवाड्यात जास्त पेट्रोल-डिझेलचे भाव आहेत, शेतकर्‍यांकडून पैसे मिळतात, ते परत शेतकर्‍यांना द्या

मी टूचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे, जो कोण दोषी असेल त्याला फासावर लटकावला पाहिजे

मी टू मी टू करत बसू नका, छेड काढली तर कानाखाली वाजवा, शिवसैनिक आहेत तुमच्या मदतीला