आज दिल्लीत रंगणार महाभारत...

ममता बनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचे सहा मंत्री आज आपल्या मंत्रिपदांचा राजीनामा देणार आहेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 21, 2012, 11:23 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
ममता बनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचे सहा मंत्री आज आपल्या मंत्रिपदांचा राजीनामा देणार आहेत. दुपारी तीन वाजता त्यांनी पंतप्रधांनांची भेट मागितली असून राजीनामा सोपवल्यानंतर ते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेणार आहेत. यूपीए सरकारला असलेला पाठिंबा काढून घेत असल्याचं पत्र ते राष्ट्रपतींना देतील.
एकीकडे एफडीआयविरोधात देशभरात विरोधी आणि काही सहयोगी पक्षांनी रान उठवलं असताना काल संध्याकाळी राष्ट्रपतींनी एफडीआयचा अध्यादेश जारी केला. यासंदर्भात पंतप्रधान मनमोहन सिंग आज देशाला संबोधित करणार आहेत. तर कॅबिनेटची आजची बैठकही रद्द करण्यात आलीय. केंद्रातलं यूपीए सरकार जनताविरोधी असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे नेते मुकूल रॉय यांनी केलाय. या सरकारचा एफडीआयचा निर्णय घटनाबाह्य असल्याचा आरोप त्यांनी केलाय. दुपारी तीन वाजताच्या आसपास पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याकडे राजीनामा सोपवण्याचा निर्णय पक्का झाल्याचंही त्यांनी सांगितलयं.