'गंभीर' सवाल, सचिनला किती संधी देणार?

शंभराव्या शतकासाठी ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरला आणखी किती संधी देणार, असा सवाल टीम इंडियाचा आघाडीचा खेळाडू गौतम गंभीरने विचारला आहे.

Updated: Feb 15, 2012, 07:13 PM IST

www.24taas.com, अँडलेड

 

 

शंभराव्या शतकासाठी ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरला आणखी किती संधी देणार, असा सवाल टीम इंडियाचा आघाडीचा खेळाडू गौतम गंभीरने विचारला आहे.

 

 

‘रोटेशन प्रणाली’मुळे प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याचे धोरण संघ व्यवस्थापनाने आखले आहे.  सचिन   केवळ कसोटी सामने खेळण्यावर भर द्यायचा, परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील ८ डावांत शतक न झळकवू शकल्यामुळे ऑस्ट्रेलियातील एकदिवसीय तिरंगी मालिकेत सचिन खेळत आहे, असे बोलले जात आहे.

 

 

आता संघातही सचिनविरोधात सूर निघू लागले आहेत. दोन मोठ्या खेळीनंतर संघातील जागा पक्की झालेल्या गौतम गंभीरने सचिनविरोधात सूर  आळवलाय. ऑस्ट्रेलिया दौर्‍यात ११ डाव मिळूनही सचिनला शतक झळकविता येत नसेल तर ‘रोटेशन प्रणाली’ ठरविलेली असताना सचिनला फक्त शंभराव्या शतकासाठी आणखी किती संधी द्यायच्या,  असा खडा सवाल करून गंभीरने संघात ‘ऑल इज नॉट वेल’ असल्याचे संकेत दिले आहेत.

 

 गंभीरला बोलण्याचा अधिकार आहे का?

 

दरम्यान,  गंभीरचा जीभेवरील ताबा सुटला खरा पण दुसर्‍याकडे एक बोट दाखवताना आपल्याकडे उर्वरित बोट असतात हे तो विसरला वाटते. कसोटी क्रिकेटमधील गेल्या २१ डावांमध्ये त्याला फक्त ५ अर्धशतके झळकावता आली आहेत. तर ३७ डाव तो शतकाविनाच राहिलाय. ही झाली वन डेची बात. तर गेल्या २२ डावांमध्ये त्याने ९ अर्धशतके झळकाविली असली तरी गेल्या २४ डावांमध्ये त्याला शतक झळकावता आलेले नाही.  त्यामुळे असा सल्ला देण्याचा त्याला अधिकार आहे का, असाही सवाल गंभीरबाबत उपस्थित करण्यात आला आहे.