मुंडेंकडे महाराष्ट्र भाजपची सूत्रे

भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्याकडे पुन्हा महाराष्ट्र भाजपाची सूत्रे सोपविण्यात आल्याचे दिसून येत आहे. मध्यंतरी मुंडेना डावले गेल्याने त्यांनी बंडाचे निशाण उभे केले होते. त्यांनी जाहीररित्या नाराजी व्यक्त केली होती. दिल्लीत गेल्यानंतर त्यांना महाराष्ट्रातून पद्धतशीरपणे बाजुला केले गेले होते.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 18, 2012, 10:11 AM IST

www.24taas.com,परळी
भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्याकडे पुन्हा महाराष्ट्र भाजपाची सूत्रे सोपविण्यात आल्याचे दिसून येत आहे. मध्यंतरी मुंडेना डावले गेल्याने त्यांनी बंडाचे निशाण उभे केले होते. त्यांनी जाहीररित्या नाराजी व्यक्त केली होती. दिल्लीत गेल्यानंतर त्यांना महाराष्ट्रातून पद्धतशीरपणे बाजुला केले गेले होते.
२०१४च्या विधानसभा निवडणुकीची सूत्रे गोपीनाथ मुंडे यांच्याकडे राहतील, असे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. २०सप्टेंबरला आयोजित भारत बंदचे नेतृत्व मुंडे मुंबईत करणार आहेत. महाराष्ट्रात भाजपची स्थिती मजबूत करण्यासाठी पक्ष श्रेष्ठींनी विचार केल्याचे दिसून येत आहे. मध्यंतरी मुंडे काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या बातम्या होत्या; पण, आता ते पूर्ण ताकदीनिशी भाजपाच्या कार्यात उतरतील, असे म्हटले जात आहे.
मुंडे हे भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी आधीच जाहीर केले आहे. मुंडे यांनी २० तारखेच्या बंदबाबत पत्रपरिषद घेतली तेव्हा तावडे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे त्यांच्यासोबत होते. त्यामुळे संघटनेत एकवाक्यता दिसून आली. बऱ्याचवेळा भाजपच्या कार्यक्रमाकडे मुंडे यांनी पाठ फिरवली होती. त्यांची ही नाराजी दूर करण्यासाठी आणि पुन्हा महाराष्ट्रात सक्रिय होण्यासाठी ही भाजपची चाल असल्याचे म्हटले जात आहे.