छत्रपतींची रणनीती: राष्ट्रधर्म हा सर्वांचा पहिला धर्म असावा

शिवछत्रपतींचे इतिहासातील स्थान अढळ आहे.

Updated: Apr 9, 2016, 04:39 PM IST
छत्रपतींची रणनीती: राष्ट्रधर्म हा सर्वांचा पहिला धर्म असावा title=

 (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

शिवछत्रपतींचे इतिहासातील स्थान अढळ आहे. ते अत्यंत कर्तृत्वान, असामान्य रणनितीकुशल, जनतेचे ह्रदय जिंकणारा जाणता राजा म्हणून शिवरायांना आपण वंदन करतो. शिवाजी राजे युगपुरुष होते. त्यांची दूरदृष्टी अफाट आणि विलक्षण होती. त्यांचे युद्धतंत्र तर भल्याभल्यांना अचंबित करणारे होते. इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार, शिवाजी हा एक मंत्र आहे आणि तो आजही साऱ्यांना प्रेरणा देऊ शकतो. इतिहास हा भूतकाळाचा साक्षीदार आणि भविष्यासाठी वाटाड्याचे कामही करतो. म्हणूनच शिवरायांनी आखून दिलेल्या मार्गावर वाटचाल करत आपण सद्यस्थितीतील शत्रूंचा सामना केला तर निश्चितपणाने त्यांना पराभूत करु शकतो.

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्रात अत्यंत मोठ्या प्रमाणात साजरी होत असते. ‘युद्धस्य कथा रम्या’ अशी आपल्याकडे म्हण आहे. त्याला अनुसरुन आपणा सर्वांना शिवाजी महाराजांच्या कथा ऐकायला आवडतात; पण त्यांनी जी शिकवण दिली होती ती आजच्या परिस्थितीत आपण वापरु शकतो का? छत्रपतींचा गनिमी कावा अतिशय प्रसिद्ध आहे. त्यांचा इतिहासदेखील अतिशय गौरवशाली आहे. आजच्या परिस्थितीत पुन्हा त्याचा नव्याने अभ्यास करुन त्याचा वापर करता येऊ शकेल का? आज अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांचे, त्यांच्या अनुयायांचे, त्याचप्रमाणे देशासाठी लढणाऱ्या वीर जवानांची स्मारके अनेक ठिकाणी बघायला मिळतात. नव्या पिढीला त्यांची यशोगाथा समजावी, त्यांच्या शौर्याची माहीती नव्या पिढीला होवून त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून ही स्फूर्तीस्मारके बांधली जातात. यातून देशभक्तीची मूल्ये रुजावीत आणि राष्ट्रीय एकात्मता राखण्यास मदत मिळावी हासुद्धा त्यामागचा उद्देश आहे. आपला देश बलशाली व्हावा, असे साऱ्याच भारतीयांना वाटते. पण देशप्रेम ही केवळ सोयीने वापरण्यापुरती किंवा स्वातंत्र्य सैनिकांवर, पोलिसांवर, लष्करांवर सोपविलेली गोष्ट नसावी. आज आपला देश सुरक्षित आहे का? त्यासंदर्भात देशासमोर कोणती आव्हाने आहेत आणि छत्रपतींच्या रणनितीचा वापर करुन ही आव्हाने कमी करु शकतो का? याचा विचार केला पाहिजे.

राष्ट्रधर्म हा सर्वांचा पहिला धर्म असावा
भारताच्या सीमेवर प्राचीन काळापासून आक्रमणे होत आहेत आणि यापुढेही होत राहणार आहेत.  पाकिस्तानकडून होत असलेला दहशतवाद असो, चीनकडून होणारा विस्तारवाद असो; युद्धे आधीही झालेली आहेत आणि यापुढेही होत राहतील. देशासाठी जगणे, देशप्रेम करणे, देशासाठी देह झिजवणे यामध्ये परमार्थ आहे. राष्ट्रधर्म हा आपणा सर्वांचा पहिला धर्म असाला पाहिजे. महाराष्ट्र हा भारताचा खड्गहस्त बनायला पाहिजे, असे छत्रपतींचे उद्गार अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणूनच आपण सर्वांनी शिवजयंतीच्या दिवशी मी माझ्या देशाला काय देऊ शकतो, देश सुरक्षित राहण्यासाठी मी प्रथम चांगला नागरिक आणि नंतर चांगला सैनिक कशा प्रकारे बनू शकतो, याचा विचार केला पाहिजे. छत्रपतींनी वापरलेला गनिमी कावा आजही उपयोगाचा ठरु शकतो. त्याचा वापर करुन देशाच्या शत्रूंवर आपण मात करु शकतो. त्यासाठी शत्रूंच्या एक पाऊल पुढे राहणे मात्र आवश्यक आहे.

संशयास्पद वाटणाऱ्या किनाऱ्यावरच्या हालचालीबाबत ताबडतोब सूचना
छत्रपती हे एकमेव राजे होते, ज्यांनी आपले लक्ष समुद्री आरमारावर केंद्रित केले होते. त्यासाठी त्यांनी समुद्र किनॉऱ्याजवळ किल्ले बांधले आणि समुद्रमार्गे येणाऱ्या शत्रूपासून राष्ट्राचे संरक्षण केले होते. ते जलदुर्ग आजही अस्तित्वात आहेत. आज खास करुन महाराष्ट्राला समुद्रमार्गांने शिरणाऱ्या दहशतवादाचा मोठा धोका आहे. शिवाजी महाराजांची युद्धनिती लक्षात घेऊन आपणही समुद्र किनाऱ्यावरुन होणारा शत्रूचा धोका रोखू शकतो. त्यासाठी समुद्र किनारी राहणाऱ्या कोळी बांधवांनी आणि इतरांनीही आपल्या सुरक्षा व्यवस्थेचे डोळे बनून संशयास्पद वाटणाऱ्या किनाऱ्यावरच्या हालचालीबाबत ताबडतोब सूचना दिली पाहिजे. अनोळखी बोट किनाऱ्यावर येणे, बोटीतून रात्री-बेरात्री अथवा दिवसा संशयास्पद सामानाची ने-आण होणे अशा गोष्टींकडे लक्ष ठेवले पाहिजे. स्थानिकांच्या मदतीमुळेच आपली किनारपट्टी सुरक्षित राहू शकते.

सक्षम गुप्तहेरांची आज आपल्या देशाला मोठी गरज
शिवाजींच्या काळात आदिलशाही, कुतुबशाही, मुगल याबरोबरच राष्ट्रातील घरभेदींवरही छत्रपतींनी नियंत्रण ठेवले आणि प्रसंगी त्यांना नामोहरमही केले. म्हणूनच त्यावेळी आपले स्वराज्य विस्तारले आणि सुरक्षित राहिले. आजच्या काळात पाकिस्तान, चीन, दहशतवादी, देशांतर्गत हिंसाचार घडविणारे माओवादी आणि ५-६ कोटी बांगलादेशी घुसखोर जे देशांतील आर्थिक व्यवस्थेवर ताण निर्माण करत आहेत.देशाच्या आतील देशद्रोही त्यांच्या देशविरोधी कारवायांना मदत करत आहेत हे सारे देशाचे शत्रू आहेत. देशांतर्गत देशद्रोह्यांची संख्या फ़ार जास्त वाढली आहे. अशा शत्रूंवर आज मात करण्याची गरज निर्माण झाली आहे. शिवाजी महाराजांचे गुप्तहेर खाते अतिशय बलशाली होतो. बहिर्जी नाईक यांनी अतिशय धोकादायक मोहिमा राबवून गुप्त माहिती मिळवली होती. ज्याचा फायदा राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी मोठ्या प्रमाणात झाला. अशा गुप्तहेरांची आज आपल्या देशाला मोठी गरज आहे. त्याद्वारे आपण देशावर होणारे दहशतवादी हल्ले रोखू शकतो. प्रत्येक नागरिकाने आपले कान आणि डोळे उघडे ठेवून सतर्कता बाळगली आणि सुरक्षा व्यवस्थांना वेळोवेळी मदत केली तर त्याचा फायदा दहशतवादी हल्ले रोखण्यास नक्कीच होऊ शकतो. दहशतवादी कसे शिरतात, त्यांच्या हलचाली कशा असतात, माओवाद्यांचे देशांतर्गत काम कसे चालते. तसेच माध्यमांद्वारे दहशतवादी विचार कसे पसरविले जातात याची माहिती प्रत्येक नागरिकाला असली पाहिजे.

इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार, शिवाजी हा एक मंत्र आहे आणि तो आजही साऱ्यांना प्रेरणा देऊ शकतो. इतिहास हा भूतकाळाचा साक्षीदार आणि भविष्यासाठी वाटाड्याचे कामही करतो. म्हणूनच छत्रपतींचे गुण अंगिकारले तर नक्कीच आपल्या देशाला सुरक्षित ठेवता येऊ शकते. चीन सीमेवर किंवा पाकिस्तानी सीमेवर भारताचे सैन्य शत्रूंचा मुकाबला करण्यासाठी सक्षम आहे. तसेच क्षेपणास्त्र आणि अणुयुद्धासाठीही आपला देश सुसज्ज आहे. त्याची काळजी इतर नागरिकांनी करु नये. परंतु चीन आणि पाकिस्तानने जे अपारंपारिक युद्ध भारताविरुद्ध सुरू केले आहे, त्याचा मुकाबला करण्यासाठी सर्व नागरिकांनी सहभागी होणे गरजेचे आहे. आज अंतर्गत सुरक्षेची चार मोठी आव्हाने भारतासमोर आहेत. १) जम्मू काश्मिरमध्ये सुरू असलेले छुपे युध्द, २) नक्षलवाद/ माओवाद/डावा दहशतवाद ३) इतर भारतात पसरलेला दहशतवाद ४) बांगलादेशी घुसखोर आणि त्यापासून होणारा त्रास होय.

देशप्रेमी नागरिकांनी सैन्यावरचे खोटे आरोप खोडावे
काश्मिरमध्ये शांतात आणि स्थैय निर्माण करण्यासाठी भारतीय सैन्य उत्कृष्ट काम करत आहेत. अलिकडेच महाराष्ट्रातील कर्नल संतोष महाडीक या वीर योद्ध्याने तीन दहशतवाद्याना यमसदनी पाठवून प्राणांची आहुती दिली हे आपणास ठाऊकच आहे. त्यामुळे काश्मीरची काळजी भारतीय नागरिकांनी करु नये, मात्र काश्मीरच्या नावावर भारतीय सैन्यावर आरोप शत्रूंमार्फत केले जातात. त्याविरुद्ध युद्ध मात्र सामान्य जनतेलाच लढावे लागेल. सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचे संरक्षण आपण देशातून केले पाहिजे. सैन्याविरुध्द माध्यमांद्वारे कोणी आरोप करीत असतील तर देशप्रेमी नागरिकांनी असे आरोप खोडले पाहिजेत.

वैचारिक दहशतवादाला उत्तर
दुसरा मोठा धोका म्हणजे मध्य भारतात पसरलेला माओवाद. माओवादांची संख्या १०-१२ हजार असण्याचा अंदाज आहे. मात्र मोदी सरकार आल्यापासून माओवाद्यांच्या कारवायांवर बरेच नियंत्रण आलेले आहे. माओवादी आता शहरांकडे वळले आहेत. तरुणांना आपल्या युध्दात सामिल करण्याचा प्रयत्न करत आहेत. वेगवेगळ्या विषयांवर आंदोलन करुन ते भारताची प्रगती रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारच्या वैचारिक दहशतवादाला आपण लगेच उत्तर द्यायला पाहिजे. आपल्या आजुबाजूला कोणी अशा वैचारिक दहशतवादाला कोणी बळी पडत असेल तर त्याला त्यापासून प्ररावृत्त करुन देशप्रेमाकडे वळवले पाहिजे. देशांतर्गत आव्हाने देशात राहुनच सोडवावी लागते. त्यामुळे काही तज्ञ किंवा माध्यमे देशांला तोडण्याबाबत चर्चा करत असतील तर त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला पाहिजे.

बांगलादेशी घुसखोरांना पकडा
सध्या ५ ते ६ कोटी बांगलादेशी भारतात घुसलेले आहेत. महाराष्ट्रात ते मुंब्रा, कल्याण, औरंगाबाद, भिवंडी आणि पुण्यात सुध्दा लाखोंने बांगलादेशी घुसलेले आहेत. त्यांना ओळखण्याची खुण म्हणजे बहुतेक बांगलादेशी आसाम किंवा प. बंगालचे निवडणूक कार्ड किंवा आधार कार्ड घेऊन येतात. त्यांच्या ओळखपत्रांवर मुजिबुर रहेमान, मालदा, पश्चिम बंगाल अशा प्रकारची माहिती असु शकते. परंतु त्यांना स्थानिक गांवाविषयी आणि नातेवाईकांविषयी माहिती विचारल्यास ती व्यवस्थित सांगता येत नाही किंवा त्याची शहानिशा केल्यास ती खोटी असल्याचे आढळते. यामध्ये अशा प्रकारचे ओळखपत्र असणारे ९९% लोक बांगलादेशी घुसखोर असल्याचे दिसते. असे बांगलादेशी फुटपाथ, झोपडपट्टी किंवा बांधकाम चालू असणाऱ्या ठिकाणी दिसतात. अशा लोकांची माहिती नागरिकांना मिळाल्यास ती पोलिसांना देता येऊ शकते आणि देश संरक्षणसाठी मदत करता येऊ शकते. अंतर्गत सुरक्षेसाठी याचा फायदा होऊ शकतो.

इंटरनेट वापरणाऱ्या तरुण वर्गाने सतर्क रहावे
अशाच प्रकारे आपण दहशतवादाविरुध्द सुध्दा लढण्यासाठी सहभागी होऊ शकतो. विशेषतः बॉम्ब स्फोटाबाबत ही सतर्कता बाळगू शकतो. दहशतवादी हल्ल्यांला प्रसिध्दी देणे हे सुध्दा अयोग्यच आहे, त्यासाठी सोशल मिडियाचा वापर करु नये. तसेच इंटरनेट वापरणाऱ्या तरुणवर्गाने सतर्क राहुन त्यांना इसिस सारख्या संघटनांची एखादी लिंक अथवा ब्लॉग आढळल्यास ताबडतोब त्यांची माहिती पोलिसांना द्यावी. २० कोटी भारतीय इंटरनेट वापरतात, त्यामुळे त्यांच्या सतर्कतेचा फायदा भारताच्या सुरक्षिततेसाठी नक्कीच होऊ शकतो. शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्यांकडून आपण अशा प्रकारे प्रेरणा घेऊ शकतो.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील युध्दे आणि आजची युध्दे यामध्ये ही बरेच साम्य आहे. छत्रपतींनी बहुतेक युध्दे ही सह्याद्रीच्या डोंगरामध्ये केली. आजही भारतीय सैनिक काश्मिरमधल्या किंवा ईशान्य भारताच्या पर्वतरांगामध्ये दहशतवाद्यांविरुध्द लढत आहेत. पावनखिडींतील लढाई आणि कारगिल युध्दांतील टायगर हिल वरील लढाई यातही बरेच साम्य आहे. असे कितीतरी दाखले आपल्याला देता येतील, ज्यावरुन शिवाजी महाराजांच्या काळातील युद्ध नितीचा उपयोग वर्तमान काळात सुध्दा कशाप्रकारे होऊ शकतो, हे समजू शकते आणि देशाच्या शत्रूविरुध्द लढण्यासाठी त्यांच्या वेगवेगळ्या युद्धनितीचा तसेच युक्त्यांचा वापर होऊ शकतो.

महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास गडचिरोली भागात नक्षलवाद डोके वर काढत आहे. पुणे-मुंबई सारख्या शहरात दहशतवाद्यांचे सावट आहे. समुद्र किनाऱ्यांपासून काही प्रमाणात धोका आहे. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात साडेतीनशेपेक्षा जास्त किल्ले बांधले आहेत आणि त्या किल्ल्यापेक्षा अधिक मजबूत अशी अनुयांची फौज तयार केली होती. त्यांच्या शूरसैनिकांची यादी खूप मोठी आहे. त्याचप्रमाणे आज भारताच्या सीमेवरही वीरयोध्याप्रमाणे लढणाऱ्या शूरविरांची यादी खूप मोठी आहे.

काही प्रमाणात तरी किमान आपण शिवाजी महाराज बनण्याचा प्रयत्न करु शकतो. आज देशासमोरच्या शत्रूंचा खात्मा करण्यासाठी ज्याप्रमाणे सक्षम बलशाली सरकारची आणि सैन्याची गरज आहे, तेवढ्याच प्रमाणात देशप्रेमी नागरिकांची देखील गरज आहे. छत्रपतींचे इतिहासातील स्थान अढळ आहे. ते अतिशय कर्तृत्वान, असामान्य रणनिती कुशल असे राजे होते. जनतेचे हृदय जिंकणारा तो जाणता राजा होता. ते युगपुरुष होते. त्यांनी शिकवलेल्या मार्गावर वाटचाल करत आपण वर्तमान शत्रूंचा सामना केला, तर नक्कीच त्यांना पराभूत करु शकतो. प्रत्येक नागरिकांनी देशांचे सैनिक आणि गुप्तहेर बनून देशाला सुरक्षित ठेवण्यास मदत केली पाहिजे. त्यासाठी सीमेवर जाण्याची गरज नाही. आपल्या आजुबाजुला घडणाऱ्या गोष्टी, सोशल मिडीयाद्वारे होणारा देशविरोधी प्रचार, भरकटणाऱ्या तरुणांना दिशा दाखवणे यासारख्या माध्यमातूनही आपण देशप्रेम व्यक्त करु शकतो आणि देशांची सुरक्षा राखण्यास मदत करु शकतो.