संसदेतील गोंधळाला सोनिया गांधी जबाबदार - सुषमा

संसदेमध्ये सध्या होत असलेल्या गोंधळाला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी जबाबदार आहेत, असा थेट आरोप लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनी केलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 30, 2013, 08:49 PM IST

www.24taas.com,झी मीडिया,नवी दिल्ली
संसदेमध्ये सध्या होत असलेल्या गोंधळाला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी जबाबदार आहेत, असा थेट आरोप लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनी केलाय.
सुषमा स्वराज यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सोनियांवर जोरदार हल्लाबोल केला. सोनिया गांधींचा लोकशाही व्यवस्थेवर विश्वास नाही, त्यांच्या इशा-यावरुनच काँग्रेसच्या मंत्र्यांनी आपल्या भाषणात अडथळे आणले. सर्वपक्षीय बैठकीत काहीही ठरो, संसदेत सोनिया गांधी ठरवतात तेच होते, या शब्दात स्वराज यांनी सोनियांवर हल्लाबोल केलाय.
आज आपल्याला लोकसभा अध्यक्षा मीराकुमार यांनीही भाषण करताना थांबवलं असा दावाही त्यांनी केलाय. यापुढे भाजप कोणत्याही सर्वपक्षीय बैठकीत सहभागी होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

कोळसा घोटाळ्यावरुन सुप्रीम कोर्टानं सीबीआय आणि सरकारला फटकारल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद लोकसभेत उमटले. युपीए हे स्वातंत्र्यानंतरचे सर्वात भ्रष्ट सरकार असल्याची टीका भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी केलीये. लोकसभेत त्यांनी युपीए सरकारच्या कार्यशैलीचा खरपूस समाचार घेतला. विरोधक वैयक्तिक फायद्यासाठी संसद बंद पाडत नाही, असं सांगत युपीए सरकार घोटाळ्यांचे नवनवे विक्रम करीत असल्याची टीकाही त्यांनी केली.
विरोधक कायदामंत्री आणि पंतप्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम राहिल्यानं लोकसभा आणि राज्यसभेत मोठा गदारोळ झाला. या गदारोळातच अर्थविधेयक आणि रेल्वे बजेट मंजूर करण्यात आलं.