४० वेळा राष्ट्रगीत वाजलं, तरी उभं राहणं गरजेचं - सुप्रीम कोर्ट

कोणत्याही फिल्म फेस्टिव्हलला किंवा कोणताही सिनेमा सुरू होण्यापूर्वी राट्रगीत आवश्यक आहे आणि तिथं उपस्थित असलेल्यांना राष्ट्रगीताच्या सन्मानासाठी उभं राहणं आवश्यक आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय.

Updated: Dec 10, 2016, 01:32 PM IST
४० वेळा राष्ट्रगीत वाजलं, तरी उभं राहणं गरजेचं - सुप्रीम कोर्ट title=

नवी दिल्ली : कोणत्याही फिल्म फेस्टिव्हलला किंवा कोणताही सिनेमा सुरू होण्यापूर्वी राट्रगीत आवश्यक आहे आणि तिथं उपस्थित असलेल्यांना राष्ट्रगीताच्या सन्मानासाठी उभं राहणं आवश्यक आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय.

'जन गणं मन'

देशभरातील सिनेमाघरांत कोणताही सिनेमा सुरू होण्यापूर्वी 'जन गणं मन' हे राष्ट्रगीत वाजणं आवश्यक असेल. राष्ट्रगीत सुरु असताना सिनेमाहॉलच्या पडद्यावर राष्ट्रीय ध्वज दाखवला जाणंही आवश्यक आहे तसंच सिनेमाघरात उपस्थित असलेल्या लोकांना राष्ट्रगीताच्या सन्मानासाठी उभं राहणं आवश्यक असेल.

'परदेशी नागरिकांसाठी आदेश का मागे घ्यावा?'

इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या एका आयोजकानं केरळमध्ये सुप्रीम कोर्टाच्या ३० नोव्हेंबरपर्यंत लागू होणाऱ्या या आदेशात सूट मागितली होती. या फेस्टिव्हलसाठी येणाऱ्या १५०० परदेशी सिनेरसिकांना यामुळे असुविधा होईल, असं कारण त्यात देण्यात आलं होतं.

पण, याला साफ नकार देत सुप्रीम कोर्टानं... केवळ परदेशी नागरिकांना असुविधा होईल म्हणून आपण आपला आदेश मागे का घ्यावा? परदेशी नागरिकांसाठी आपण आपला आदेश मागे का घ्यायला हवा? जर वेगवेगळ्या कार्यक्रमांत ४० सिनेमे चालवले गेले तर तुम्हाला ४० वेळा उभं राहावं लागेल, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय.

'हा स्वातंत्र्याचा प्रश्न?'

राष्ट्रगीताचा सन्मान करावा किंवा करू नये, हा तुमच्या स्वातंत्र्याचा प्रश्न असू शकतो? असा प्रश्नही सर्वोच्च न्यायालयानं ठणकावत विचारलाय. प्रत्येक देशाला आपल्या राष्ट्रगीताचा गर्व आहे... पण, आम्हाला हे समजत नाही की राष्ट्रगीताचा हा आदेश दिल्यानंतर इतका वाद का सुरू झाला?

दिव्यांगांना मात्र राष्ट्रगीता दरम्यान उभं राहण्यास सूट देण्यात आलीय. विकलांग व्यक्ती कोणत्या प्रकारे राष्ट्रगीताप्रती सन्मान व्यक्त करू शकतील, यावर केंद्र सरकारनं १० दिवसांच्या आत निर्देश जाहीर करावेत, असेही आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत.