दसरा : चांगल्याचा वाईटावर विजय मिळवण्याचा दिवस

आनंद, समाधान आणि सोबत संपदा मिळवून आणायची. यश किर्ती प्राप्त करायची आणि लुटायची तो हा दिवस. म्हणूनच आदिमाया आदिशक्तीच्या दर्शनाच्या दर्शनानं या दिवसाची सुरुवात करुया.

Updated: Oct 22, 2015, 09:49 AM IST
दसरा : चांगल्याचा वाईटावर विजय मिळवण्याचा दिवस title=

मुंबई : आनंद, समाधान आणि सोबत संपदा मिळवून आणायची. यश किर्ती प्राप्त करायची आणि लुटायची तो हा दिवस. म्हणूनच आदिमाया आदिशक्तीच्या दर्शनाच्या दर्शनानं या दिवसाची सुरुवात करुया.

आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून पाळला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र पाळले जाते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरा करण्यात येतो. दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा. नऊ दिवसांचा नवरात्र उत्सव पूर्ण होतो. खंडे नवमीला देव उठतात आणि मग दारी येतो तो दसरा. याच दिवशी देवीनं महिषासुराशी युद्ध करुन त्याला ठार केलं. प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला तो याचदिवशी. चांगल्याचा वाईटावर विजय मिळवण्याचा हा दिवस. म्हणून या दिवसाला विजयादशमी, असंही म्हणतात.

दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा... या सणात आपल्या मनातील अंधश्रद्धा ,आळस ,भ्रष्टाचार असा रावण जाळले पाहिजे त्यासाठी आपणच राम झाले पाहिजे असा सल्ला ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ दा.कृ. सोमण यांनी दिलाय. शिवाय इकोफ्रेंडली दसरा साजरा करण्याचं आवाहनही त्यानी केलंय.

दसर्‍याच्या दिवशी परस्परांना सोने म्हणून शमी व आपट्याची पाने देतात. या दिवशी सीमोल्लंघन,शमीपूजन अपराजिता पूजन आणि शस्त्रपूजन केले जाते. सायंकाळी गावाची सीमा ईशान्येस ओलांडून जायचे, शमी किंवा आपट्याचे पूजन करायचे, तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना करावयाची, तिला प्रार्थना करावयाची की मला विजयी कर. त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्र पूजन, व्यापार्‍यांनी व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी सरस्वतीपूजन करायचे अशी प्रथा आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.