आयपीएल राज्याबाहेर गेल्यास 100 कोटींचं नुकसान

आयपीएल महाराष्ट्राबाहेर गेलं तर राज्याचं 100 कोटींचं नुकसान होईल, अशी प्रतिक्रिया बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. 

Updated: Apr 9, 2016, 04:44 PM IST
आयपीएल राज्याबाहेर गेल्यास 100 कोटींचं नुकसान title=

मुंबई: आयपीएल महाराष्ट्राबाहेर गेलं तर राज्याचं 100 कोटींचं नुकसान होईल, अशी प्रतिक्रिया बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. राज्यानं 100 कोटींचं नुकसान करण्यापेक्षा हे पैसे दुष्काळासाठी वापरावे असा सल्लाही अनुराग ठाकूर यांनी दिला आहे. 

राज्यामध्ये दुष्काळ आहे, त्यामुळे आयपीएलवेळी पाण्याची नासाडी होईल, ती टाळण्यासाठी आयपीएलच्या राज्यात होणाऱ्या मॅच बाहेर घ्याव्या, या मागणीसाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. 

दरम्यान आयपीएल राज्याबाहेर गेली तरी काही फरक पडणार नाही, आयपीएलसाठी पिण्या योग्य पाणी देणार नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 

अनुराग ठाकूर हे बीसीसीआयचे सचिव तसंच भाजपचे खासदार आहेत. त्यामुळे आयपीएलच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस आणि ठाकूर या भाजपच्या 2 नेत्यांमध्ये मतभेद आहेत का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये आयपीएलच्या 18 मॅच होणार आहेत. यातल्या पहिल्या मॅचला हायकोर्टानं परवानगी दिली आहे. पण पुढच्या मॅचबाबतची टांगती तलवार अजूनही कायम आहे.