सचिन-विनोदमधला दुरावा अजूनही कायम

 एका मोठ्या दुराव्यानंतर विनोद कांबळी सचिन तेंडुलकरशी पुन्हा नव्याने जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत असला, तरी सचिन त्याला फारसा प्रतिसाद देताना दिसत नाहीये.

Updated: Nov 9, 2017, 02:58 PM IST
सचिन-विनोदमधला दुरावा अजूनही कायम title=

मुंबई : एका मोठ्या दुराव्यानंतर विनोद कांबळी सचिन तेंडुलकरशी पुन्हा नव्याने जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत असला, तरी सचिन त्याला फारसा प्रतिसाद देताना दिसत नाहीये.

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या अलीकडेच झालेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बॅकस्टेज सचिन-राजदीप-अतुल कसबेकर आणि विनोद यांचा एकत्रित सेल्फी आणि त्यावर ट्विटर व्यक्त झालेल्या प्रतिक्रियांमुळे सचिन-विनोद वाद संपुष्टात आल्याचं बोललं जात होते.

पण मुंबई रणजी @ 500 या सोहळ्यात सचिनने विनोदला अजूनही लांबच ठेवणं योग्य मानल्याचं आढळून आलं. कार्यक्रमात सचिन आणि विनोद एकमेकांपासून खूप अंतरावर बसले होते.

सचिनने संपूर्ण कार्यक्रमात विनोदकडे लक्षही दिले नाही. तसेच विनोद सत्कार स्वीकारायला व्यासपीठावर आला आणि तो सत्कार स्वीकारून जात असताना खाली बसलेल्या सचिनशी त्यानं संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण सचिनने त्याकडे दुर्लक्ष केल्याचं जाणवलं. व्यासपीठावर ग्रुप फोटो काढतानाही सचिन-विनोद एकमेकांपासून लांब उभे होते.

कार्यक्रम संपल्यानंतरही संवादाचा प्रयत्न झाला नसल्याचं कळतं. सचिन लगेच निघून गेल्याचं कळतं.