आयपीएल | विजयाचे शतकं लगावणारी मुंबई पहिलीच टीम

अशी कामगिरी करणारी मुंबई ही पहिलीच टीम ठरली आहे.  

Updated: Apr 4, 2019, 02:14 PM IST
आयपीएल | विजयाचे शतकं लगावणारी मुंबई पहिलीच टीम title=

मुंबई : चेन्नई विरुद्ध मुंबई यांच्यात बुधवारी झालेल्या  मॅचमध्ये  मुंबईने 37 रनने विजय मिळवला. या विजयासह मुंबईच्या नावे एक रेकॉर्ड  झाला आहे. चेन्नईला पराभूत करुन मुंबई टीमने आयपीएल मध्ये 100 मॅच जिंकण्याचा बहुमान मिळवला आहे. अशी कामगिरी करणारी मुंबई ही पहिलीच टीम ठरली आहे. मुंबईने आयपीएलच्या पहिल्या पर्वापासून ते आतापर्यंत एकूण 175 मॅच खेळल्या आहेत. त्यापैकी 100 मॅच मुंबईने जिकंल्या आहेत. विशेष म्हणजे यातील एक विजय हा सुपर ओव्हरमध्ये मिळवला आहे. तर 75 मॅच मध्ये मुंबईला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

 

बुधवारी वानखेडेवर झालेल्या मॅचमध्ये मुंबईने पाहुण्या चेन्नईच्या विजयाला ब्रेक लगावला. यामुळे चेन्नईचा या पर्वातील हा पहिलाच पराभव ठरला आहे. याआधी झालेल्या पहिल्या ३ मॅच चेन्नईने जिंकल्या होत्या. मुंबई टीमने  यंदाच्या  १२ व्या पर्वात  एकूण ४ मॅच खेळल्या आहेत. यापैकी २ मॅच जिंकल्या असून २ मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे.

आयपीएल मध्ये सर्वाधिक मॅच जिंकण्याच्या बाबतीत मुंबई नंतर दुसऱ्या क्रमांकावर चेन्नईचा क्रमांक लागतो. चेन्नईने आतापर्यंत 93 मॅचमध्ये विजय मिळवला आहे. तर 88 मॅचसह कोलकाता 3 ऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.

मुंबईची कामगिरी

मुंबईने आतापर्यंत आयपीएलच्या ११ मोसमांपैकी ३ वेळा विजेतपद पटकावले आहे. तर एकदा उपविजेतपदावर समाधान मानावे लागले आहे. मुंबईला आयपीएलचे पहिले विजेतेपद मिळवण्यासाठी २०१३ साल उजडण्याची वाट पाहावी लागली. पहिल्यांदा आयपीएलचे विजेतपद मिळवल्या नंतर मुंबईची कामगिरी बहरत गेली. मुंबई टीमने 2013 नंतर दर 2 वर्षाच्या अंतराने विजेतेपद जिंकण्याची परंपरा अबाधित ठेवली आहे. मुंबईने 2013 नंतर 2015 आणि 2017 साली विजेतपद मिळवले आहे. 

चेन्नई-कोलकाता विरुद्ध दमदार कामगिरी

आयपीएल मध्ये  चेन्नई   आणि कोलकाता या टीमची आतापर्यंतची एकूण कामगिरी  ही दमदार आहे. परंतू या टीमविरुद्ध मुंबईने धडाकेबाज कामगिरी केलेली आहे. मुंबईने या दोन्ही टीमला १५ वेळा पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे आयपीएल मध्ये वरचढ असलेल्या टीमला देखील मुंबईने टक्कर दिली आहे.