...हे अत्यंत लाजिरवाणं; पाकिस्तान सरकारवर अदनान सामीची आगपाखड

भारताकडून काहीतरी शिका.... 

Updated: Feb 3, 2020, 10:12 AM IST
...हे अत्यंत लाजिरवाणं; पाकिस्तान सरकारवर अदनान सामीची आगपाखड  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया आणि कला वर्तुळात गायक अदनान सामी याला पद्मश्री पुरस्कार देण्याच्या मुद्द्यावरुन बऱ्याच चर्चा पाहायला मिळत आहेत. या चर्चा शमत नाहीत तोच अदनान पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. यावेळ त्याने एक ट्विट करत पाकिस्तानने किमान लाज बाळगावी, असा सुरही आळवला आहे. अदनाने या शब्दांत त्याचा संताप नेमका का व्यक्त केला याचा प्रत्यय त्याने शेअर केलेल्या एका व्हिडिओतून येत आहे. Corona virus कोरोना व्हायरसच्या भीतीने साऱ्या जगात महत्त्वाची पावलं उचलण्यात येत आहेत. 

चीनमध्ये असणाऱ्या अनेक नागरिकांना आपआपल्या देशांमध्ये परत आणण्यात येत आहे. पण, पाकिस्तान सरकार मात्र यावर कोणतीही भूमिका बजावताना दिसत नाही. सोशल मीडियावर यासंबंधीचा व्हिडिओसुद्धा पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ मुळच्या एका पाकिस्तानी विद्यार्थ्याचा आहे, जो चीनमधील वुहान येथे आहे. या व्हि़डिओमध्ये तो विद्यार्थी एका बसकडे सर्वांचं लक्ष वेधत आहे. भारतीय दूतावासाच्या या बसमध्ये भारतीय विद्यार्थी बसताना दिसत आहेत. ज्यांना भारतात परत आणण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत. वुहान विद्यापीठात ही बस दिसत आहे. जी, पुढे विमानतळाच्या दिशेने जाणं अपेक्षित आहे. 

व्हिडिओमध्ये तो पाकिस्तानी विद्यार्थी अतिशय महत्त्वाची माहिती देत आहे. ज्यामध्ये बांगलादेशी विद्यार्थ्यांनाही त्यांच्या देशात परत नेण्यासाठीचे प्रयत्न सुरु झाल्याचं सांगण्यात येत आहे. या साऱ्यामध्ये तो पाकिस्तान सरकारवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत आहे. 'आम्ही पाकिस्तानीच आहोत जे इथे अकडलेलो आहोत. सरकार आम्हाला सांगतंय तुम्ही जगा अथवा जगू नका, तुम्हाला संसर्ग झाला तरीही आम्ही काही करु शकत नाही. चीनमधून तुम्हाला बाहेर काढू शकत नाही. काहीतरी लाज वाटली पाहिजे या पाकिस्तानला. शिका काहीतरी भारताकडून.... आपल्या नागरिकांची ते कशा प्रकारे काळजी घेत आहेत, पाहा...', असं तो विद्यार्थी म्हणताना दिसतो. 

वाचा : ...म्हणून सैन्यदल वाहनांच्या चाकांना लावली जाते साखळी

भीती, आर्जव आणि निराशा असे सूर त्या विद्यार्थ्याच्या व्हिडिओमध्ये पाहत अदनाननेही तो शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली. 'मुस्लिम  कायमच त्यांचं आयुष्य भारताप्रतिची निष्ठा सिद्ध करण्यासाठी व्यतीत करतील. वगैरे वगैरे..... पण, पाकिस्तानी मुसलमानांना याचा काय फायदा मिळत आहे. इथे तर त्यांचं सरकार नागरिकांसोबत केराप्रमाणे व्यवहार करत आहे. हे अत्यंत लाजिरवाणं आहे.....', असं ट्विट करत अदनानने संताप व्यक्त केला.