'तेरव' चित्रपटाचा ट्रेलर नितीन गडकरी यांच्या हस्ते लॉन्च!!

Terav Movie Nitin Gadkari : 'तेरव' या चित्रपटात नाटकाप्रमाणेच या चित्रपटात देखील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील एकल महिला व मुलींनी अत्यंत सुंदर भूमिका केलेल्या आहेत.

दिक्षा पाटील | Updated: Feb 26, 2024, 12:16 PM IST
'तेरव' चित्रपटाचा ट्रेलर नितीन गडकरी यांच्या हस्ते लॉन्च!! title=
(Photo Credit : Social Media)

Terav Movie Nitin Gadkari : येत्या 8 मार्चला महिला दिनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ घातलेल्या 'तेरव' बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर केंद्रीय मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते मा. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आला. विदर्भाच्या मातीतून असे चित्रपट यायला हवेत आणि आपल्या समस्या मांडल्या जायला हव्यात, असे यावेळी नितीन गडकरी म्हणाले.  नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी हा ट्रेलर लॉन्च संपन्न झाला. याप्रसंगी चित्रपटाचे लेखक श्याम पेठकर, संगीतकार वीरेंद्र लाटणकर,अभिनेत्री  नेहा दंडाळे, श्रद्धाताई तेलंग, देवेंद्र लुटे ही कलावंत मंडळी आणि पत्रकार अजय बिवडे आवर्जून उपस्थित होते.

विदर्भ मराठवाडा खानदेश या कापूसपट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होतात. हा एक अत्यंत संवेदनशील विषय आहे आणि 'कॉटन सॉईल तंत्र' या विषयावर या संदर्भात काम होणे गरजेचे आहे; पण श्याम पेठकर यांनी याआधी 'गोष्ट छोटी डोंगराएवढी' या चित्रपटाच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्या विषय अत्यंत परिणामकारक पद्धतीने  मांडला होता आणि आता आगामी "तेरव" या चित्रपटातून त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील त्या शेतकऱ्याची मागे एकटी उरलेली पत्नी म्हणजे एकल महिला यांच्या संघर्षावर चित्रपट लिहून लढण्याची उर्मी देणारा चित्रपट निर्माण केलेला आहे. विदर्भातील प्रयोगशील नाट्यदिग्दर्शक हरीश इथापे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन उत्तमपणे  केलेले आहे. व्यावसायिक कमाई करू न देणाऱ्या चित्रपटाच्या मागे निर्माता म्हणून उभे राहण्याची संवेदनशीलता 'अंजनी कृपा प्रोडक्शनच्या' माध्यमातून निर्माता श्री, नरेंद्र जीचकर यांनी दाखवली याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि हा चित्रपट सगळ्यांनी आवर्जून बघावा, असे आवाहन करतो, असे नितीन गडकरी म्हणाले.

हा चित्रपट पूर्णतः विदर्भाच्या भाषेत आणि 90 टक्केच्या वर विदर्भीय कलावंत घेऊन करण्यात आलेला आहे. चित्रपटाचे छायांकन सुप्रसिद्ध छायाचित्रणकार सुरेश देशमाने यांनी अत्यंत तळमळीने आणि आस्थेने केले, असे श्याम पेठकर म्हणाले.

हेही वाचा : 'मी फक्त त्याचा जीव घ्यायचं बाकी होतं'; स्विगी डिलेव्हरी बॉयवर एवढा का संतापला अभिनेता?

हा चित्रपट आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील एकल महिलांच्या जीवन संघर्षावर घेतलेला आहे आणि त्या संकटांना न घाबरता कसा लढा देतात हे या चित्रपटात दाखवले आहे. या चित्रपटात किरण खोजे, संदीप पाठक, किरण माने, नेहा दंडाळे या प्रस्थापित कलावंतांसह विदर्भातील मधुभैया जोशी, श्रद्धाताई तेलंग, प्रभाकर आंबोने, वत्सला पोलकमवार, प्रवीण इंगळे, देवेंद्र लुटे, यशवंत चोपडे, शर्वरी पेठकर, संहिता इथापे, वैदेही चौरे,  दिलीप देवरणकर या कलावंतांनी भूमिका केल्या आहेत. सुप्रसिद्ध वऱ्हाडी कवी दिवंगत शंकर बडे यांच्या कवितेला गाण्याचा साज देण्यात आलेला आहे. चित्रपटाचे थीम सॉंग ज्ञानेश वाकुडकर यांनी लिहिले आहे. आणखी दोन गाणी "तेरव" या नाटकात शाम पेठकर यांनी लिहिलेली चित्रपटात घेण्यात आलेली आहे. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे नाटकाप्रमाणेच या चित्रपटात देखील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील एकल महिला व मुलींनी अत्यंत सुंदर भूमिका केलेल्या आहेत.