कर्नाटकात बहुमत सिद्ध करण्याकडे घोडेबाजार, आमदार कोच्चीकडे रवाना

कर्नाटकमध्ये बी. एस. येडियुरप्पांच्या शपथविधीनंतर आता बहुमत सिद्ध करण्याकडे घोडेबाजार आणि राजकीय कुरघोड्यांचे राजकारण सुरु झाले आहे. 

सुरेंद्र गांगण | Updated: May 18, 2018, 08:51 AM IST
कर्नाटकात बहुमत सिद्ध करण्याकडे घोडेबाजार, आमदार कोच्चीकडे रवाना title=

बंगळुरु : कर्नाटकमध्ये बी. एस. येडियुरप्पांच्या शपथविधीनंतरही सत्तासंघर्ष सुरुच आहे. शपथविधीनंतर आता बहुमत सिद्ध करण्याकडे घोडेबाजार आणि राजकीय कुरघोड्यांचे राजकारण सुरु झाले आहे. या सगळ्यात दगाफटका होऊ नये म्हणून  काँग्रेस आणि जेडीएसने आपले आमदार कर्नाटकबाहेर नेण्याचा निर्णय घेतला. रात्री उशिरा काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार हे कोच्चीला रवाना झाले.

कर्नाटकात घोडेबाजार होण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी आपल्या आमदारांना भाजपकडून पैशांचे आमिष दखवून खेरदी केले जाऊ नये यासाठी काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांना हैदराबाद आणि कोची येथे हालवण्यात आले आहे. त्याचबरोबर जेडीएसचे प्रमुख एच. डी. दैवेगौडा यांनी गुरुवारी रात्री आंध्रप्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिराला भेट दिली.

बहुमत नसतानाही केवळ एकमेव मोठा पक्ष ठरलेल्या भाजप राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण देऊन १५ दिवसांत बहुमत सिद्ध करण्यात सांगितले होते. यावर काँग्रेस-जेडीएसने आक्षेप घेतला होता. त्यामुळे असंविधानिक पद्धतीचा राज्यपालांनी दिलेला निर्णय असल्याचे सांगत अनेकांनी ही लोकशाहीची हत्या असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसा थेट आरोप काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता.

भाजपकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे अनिश्चिततेची तलवार डोक्यावर कायम असल्याने येडियुरप्पांनी काल एकट्याने राज्यपालांकडून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पद ग्रहण करताच पहिल्याच दिवशी त्यांनी काही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. तर काँग्रेस-जेडीएसचे आमदार असलेल्या रिसॉर्टची सुरक्षा काढून घेतली. त्यामुळे भाजपकडून विरोधी आमदार गळाला लावण्यासाठी प्रयत्न होत आहेत. मात्र, भाजपला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी सावध भूमिका घेत आमदारांना राज्याबाहेर काढले आहे.