भाविकांना पायदळी तुडवत जाते गाय; दिवाळीत 'मृत्यूच्या खेळाची' परंपरा

MP Unique Diwali Tradition: ही परंपरा गावात केव्हा सुरू झाली हे कोणालाच आठवत नाही. पण तरुणांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकजण ही परंपरा पाहतच मोठा झालाय.

Pravin Dabholkar | Updated: Nov 13, 2023, 06:13 PM IST
भाविकांना पायदळी तुडवत जाते गाय; दिवाळीत 'मृत्यूच्या खेळाची' परंपरा title=

MP Unique Diwali Tradition: देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जाते. देशातील विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. मध्य प्रदेशात दिवाळीमध्ये पुर्वापार एक अनोखी परंपरा दिसून येते. ही परंपरा पाहून याला चमत्कार म्हणायचा की अंधश्रद्धा? असा प्रश्न तुम्हाला पडेल. उज्जैन, महाकालेश्वर शहरापासून सुमारे 60 ते 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या बदनगर तहसीलच्या भिदावद गावात गोवर्धन पूजेला अनोखी परंपरा पाहायला मिळते. गावात सकाळी गायीची पूजा करण्यात येते. मग पूजेनंतर, लोक जमिनीवर झोपतात आणि गायी त्यांच्यावर धावायला लागतात. हा सर्व प्रकार पाहण्यासाठी मोठी गर्दी जमते. याला गाय गौरी पूजन असेही म्हणतात.

ही परंपरा गावात केव्हा सुरू झाली हे कोणालाच आठवत नाही. पण तरुणांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकजण ही परंपरा पाहतच मोठा झालाय. या गावातील आणि आजूबाजूच्या भागातील लोक येथे येतात. येथे आलेल्या अनेकांच्या मनात काहीना काही इच्छा असते जी त्यांना पूर्ण करुन घ्यायची असते. दिवाळीच्या पाच दिवस आधी ग्यारसाच्या दिवशी हे सर्वजण आपापली घरे सोडतात आणि माता भवानीच्या मंदिरात येऊन राहतात. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा येथे जत्रा भरते. ज्यांची इच्छा पूर्ण झालेली असते ते गायीसमोर जमिनीवर झोपतात.

पाच दिवस उपवास, मोठ्या थाटामाटात नवसाची मिरवणूक

दिवाळीनंतर, पाडव्याला, सूर्य उगवण्याआधीच हे लोक गौरीची पूजा करू लागतात. प्रत्येकजण आपल्या गायी तयार करतो. गावातील चौकात लोक जमतात. त्यानंतर संपूर्ण गावात प्रार्थना करणाऱ्या लोकांची मिरवणूक काढली जाते. मिरवणूक संपल्यानंतर नवस करणारे भाविक जमिनीवर तोंड टेकवतात. त्यानंतर गायींना एकत्रितरित्या सोडण्यात येते. या गायी धावत जाऊन जमिनीवर पडलेल्या भक्तांच्या अंगावरुन जातात. आपल्या पूर्वजांच्या काळापासून चालत आलेल्या या परंपरेचे पालन केल्याने इच्छा पूर्ण होतील, अशी यामागची भावना असते. या काळात मनात इच्छा बाळगणारे पाच दिवस उपवास करतात.

आनंद, शांती आणि समृद्धीसा प्रार्थना 

गाय हे सुख, समृद्धी आणि शांतीचे प्रतीक आहे, अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे. गाईच्या शरीरात देवी-देवता वास करतात असे शास्त्रातही सांगितले आहे. पाडव्याच्या दिवशी ढोल-ताशांच्या गजरात चौकात गायीची पूजा केली जाते. मन्नती पूजेसाठी एक सजवलेले ताट आणते, ज्यामध्ये पूजेच्या साहित्यासोबत शेण ठेवले जाते. तिची व्यक्तिशः गौरीच्या रूपात पूजा केली जाते. साक्षात गौरीच्या रुपात पारंपारिक गाणी गाऊन आवाहन केले जाते. सुख आणि शांती मिळावी म्हणून आई गौरीला गावच्या चौकात येण्याची विनंती केली जाते.