काका, मला घर द्या; तेज प्रताप यांची नितीश कुमारांना विनवणी

सरकारी बंगला मिळविण्यासाठी केला होता अर्ज

Updated: Dec 28, 2018, 01:13 PM IST
काका, मला घर द्या; तेज प्रताप यांची नितीश कुमारांना विनवणी title=

पाटणा: सध्या कौटुंबिक विवंचनेत असलेले लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेज प्रताप यादव पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. तेज प्रताप घरासाठी थेट मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे धाव घेतली आहे. तेज प्रताप यादव यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांची पत्नी ऐश्वर्या हिच्यापासून घटस्फोट घेण्यासाठी अर्ज केला होता. तेज प्रताप आणि ऐश्वर्या यांच्या लग्नाला अवघे सहा महिनेच झाले होते. त्यामुळे दोघांच्या कुटुंबीयांनीही या निर्णयाविषयी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, तेज प्रताप यादव आपल्या निर्णयावर ठाम राहिले होते. मात्र, घटस्फोटाच्या निर्णयामुळे त्यांच्या घरात सतत कुरबुरी सुरु आहेत. या सगळ्याला कंटाळून तेज प्रताप यांनी स्वतंत्रपणे राहण्याचा निर्णय घेतला होता. सध्यादेखील ते पाटणा येथील सर्क्युलर रोडवरील घरी एकटचे राहतात. मात्र, त्यांनी काही दिवसांपूर्वी राहण्यासाठी स्ट्रँण्ड रोड येथील सरकारी बंगला मिळावा, असा अर्ज केला होता. परंतु, संबंधित अधिकाऱ्यांनी तेज प्रताप यांच्या अर्जाला कोणतेही उत्तर दिले नाही. 

अखेर तेज प्रताप यादव यांनी थेट मुख्यमंत्री नितीश कुमार यांना फोन केला. काका मला घर मिळणार नाही का, असा सवाल त्यांनी नितीश यांना विचारला. यावर नितीश कुमार यांनी तेज प्रताप यांना मदतीचे आश्वासन दिले. मात्र, त्यापूर्वी मला एकदा लालू प्रसाद यादव यांच्याशी बोलावे लागेल, असे नितीश यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

तेज प्रताप यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, दोघांच्याही घरच्यांकडून पुन्हा एकत्र राहण्यासाठी दबाव आणला जात आहे. १२ मे २०१८ रोजी तेज प्रताप यादव यांचे ऐश्वर्या रायबरोबर लग्न झाले होते. मध्यंतरी ऐश्वर्या राजकारणात येणार असल्याचीही चर्चा होती. मात्र, तेज प्रताप यांनी अचानक घटस्फोट घेण्याचा निर्णय जाहीर करुन सर्वांनाच धक्का दिला होता. मला लग्न करायचं नव्हतं हे मी माझ्या आई-वडिलांना सांगितलं होतं. पण त्यावेळी कोणी माझं ऐकल नाही. आमच्या दोघांची मन जुळत नाहीत. आमचे स्वभाव भिन्न आहेत. माझ्या साध्या सवयी असून मी एक साधाभोळा माणूस आहे तर ऐश्वर्या आधुनिक विचारांची मुलगी आहे. दिल्लीमध्ये तिचे शिक्षण झाले. तिला शहरी आयुष्य जगण्याची सवय आहे असे तेज प्रताप यांनी सांगितले होते.