धर्मा पाटीलांचा प्राण घेणाऱ्या प्रकल्पाची धक्कादायक कहाणी

धुळे जिल्ह्यातील विखरण या छोट्याश्या गावातील शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येस कारण ठरलेल्या प्रकल्पाची मोठी विचित्र कहाणी आहे. 

Updated: Jan 29, 2018, 03:37 PM IST
धर्मा पाटीलांचा प्राण घेणाऱ्या प्रकल्पाची धक्कादायक कहाणी title=

योगेश खरे, झी मीडिया, धुळे : धुळे जिल्ह्यातील विखरण या छोट्याश्या गावातील शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येस कारण ठरलेल्या प्रकल्पाची मोठी विचित्र कहाणी आहे. 

प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध

सुरुवातीपासून या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध होता. विरोधामुळे तत्कालीन आघाडी सरकारने प्रकल्प थंडबस्त्यात टाकला होता. मात्र, नंतर या भागाचे आमदार आणि रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांनी पुन्हा हा प्रकल्प सुरु करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र आधी भूसंपादनाच्या घोळामुळे हा विषय अधिक किचकट आणि गुंतागुंतीचा होत गेला. या दरम्यान सुरु असेलेल्या संघर्षात पाटील यांचा बळी गेला. 

कधी झाले व्यवहार?

राज्यात विजेचा प्रचंड तुडवडा भरून काढण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारने अनेक वीज निर्मिंती प्रकल्प हाती घेतली. त्यापैकी एक मेथी विखरण औष्णिक विद्युत वीज निर्मिती प्रकल्प. या प्रकल्पासाठी महाजन कोने पुढाकार घेतला आणि आवश्यक ६०० हेक्टर जमिनीपैकी ४०० हेक्टर जमीन शेतकऱ्यांकडून थेट खरेदी करून घेतली तीही पडक्या भावात. बखळ जमीन असेलेल्या शतकऱ्यांनी आपली जमीन विकली. मात्र सुपीक जमीन विकायला शेतकरी काही तयार झाले नाहीत. त्यामुळे ६०० पैकी २०० हेक्टर शेतजमीन अधिग्रहित झाली नाही. हे संपूर्ण व्यवहार २०१२ - १३ मध्ये पूर्ण झाले. 

प्रकल्प पडला बंद आणि...

मात्र पुढे विजेची गरज पूर्ण झाल्यामुळे हा प्रकल्प मागे पडला. युती शासन सत्तेत आल्यावर मग या प्रकल्पाला औष्णिक ऊर्जेऐवजी सौर ऊर्जा प्रकल्पात परावर्तित करण्यात आले. पुन्हा भूमी अधिग्रहांची कारवाई सुरु झाली आणि धर्मा पाटील यांचा बळी गेला. या प्रकल्प बाधितांना योग्य न्याय मिळावा आणि काम पुढं सरकावे यासाठी ८ जानेवारीला मंत्री जयकुमार रावळ यांनी धुळ्यात तर नोव्हेंबर महिन्यात डॉ. सुभाष भामरे यांनी दिल्लीला बैठक घेतली होती. मात्र शेतकरी या मोबदल्याचा विरोध करीत होते. २३ जानेवारी रोजी मुंबई मंत्रालयात या प्रल्पाची एक बैठक पार पडली त्यातही काही ठोस समोर आले नाही. 

सौर ऊर्जा प्रकल्पाची माहिती 

- महाजनको दोंडाईचा सौर ऊर्जा पार्क असे प्रकल्पाचे नाव. 

- ५०० मेगा वॉट वीज निर्मिती प्रस्तावित 

- ६०० हेक्टर जमिनीची आवश्यकता पैकी ४०० हेक्टर जमीन २०१२- १३ मध्ये खरेदी 

- २०० हेक्टर सुपीक जमीन देण्यात शेतकऱ्यांचा विरोध 

- ४१८ खातेदारांचे सक्तीने भूसंपादन सुरु होते, त्यापैकी एक धर्मा पाटील एक होते. 

- पाटील याचा भुसम्पादनाचा निवडा १७ मार्च २०१५ मध्ये झाला तर २०१६ मध्ये नोटीस पेमिन्ट

- पाटील यांची एक हेक्तर ४० आर जमिनीचे भूसंपादन 

- अत्यल्प ४ लाख १५ हजारांचा मोबदला. 

- त्यानंतर पाटील यांचा संघर्ष सुरु, अधिकारी, नेते, विविध कार्यलयात यांना फेऱ्या 

- उपयोग होत नाही म्हणून २२ जानेवारी रोजी मंत्र्यालयात विष प्राशन केले 

- २८ जानेवारी रोजी धर्मा पाटील यांची प्राणजोत मालवली

पाटील यांचा जो संघर्ष होता तो प्रामुख्याने जमिनीच्या मोबदल्यातही नव्हे तर त्याठिकाणी असेलेल्या अंब्याच्या झाडांसाठी होता.

धर्मा पाटील यांचा संघर्ष नेमका कश्यासाठी ?

- पाटील यांच्या शेतातील संयुक्त मोजणी पत्रकात अंब्याच्या रोपांची नोंद आहे. 

- मात्र अंतिम मुल्याकंत कृषी विभागाने आब्यांची झाड नसल्याची नोंद करीत शून्य मुल्याकंन कळवले 

- पाटील याना त्यांच्या विहिरीचा आणि कूपनलिकेचे मोबदला देखील मिळाला नाही 

- प्रशासनाच्या मते पाटील याना योग्य मोबदला दिला आहे.

- प्रशासनाने मोबदला पक्षपातीपणे दिल्याचा पाटील यांचा आरोप 

- आपल्याला योग्य मोबदला मिळावा यातही पाटील यांचा संघर्ष सुरु होता. 

पाटील यांचा बळी हा सुस्थ आणि माणसांची किंमत नसलेल्या व्यवस्थेने घेतला आहे, यात प्रामुख्याने प्रशासन आणि सत्ताधारी जबादार आहेत. प्रशासनातील शुक्राचार्यांना शोधून आणि किचकट भूसंपादन कायदा बदलून सरकार थोडे प्रायश्चित करू शकते.

- पाटील यांची एक हेक्तर ४० आर जमिनीचे भूसंपादन 

- अत्यल्प ४ लाख १५ हजारांचा मोबदला. 

- त्यानंतर पाटील यांचा संघर्ष सुरु, अधिकारी, नेते, विविध कार्यलयात यांना फेऱ्या