सिंधुदुर्गात राणेंना मोठा धक्का; या ठिकाणी राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेनेची सत्ता

Sindhudurg Nagar Panchayat Election Results: शिवसेनेने केंद्री मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांना जोरदार दे धक्का दिला आहे.  

Updated: Jan 19, 2022, 04:47 PM IST
सिंधुदुर्गात राणेंना मोठा धक्का; या ठिकाणी राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेनेची सत्ता title=

मुंबई : Sindhudurg Nagar Panchayat Election Results: शिवसेनेने केंद्री मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांना जोरदार दे धक्का दिला आहे. आमदार नितेश राणे यांच्या हातून कुडाळ नगरपंचायतमील सत्ता गेली आहे. तसेच देवगड नगरपंचायत निवडणुकीमध्ये राणे यांना धक्का बसला आहे. देवगड नगरपंचायतमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. सिंधुदुर्गात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांना धक्का देणारा निकाल समोर आला आणि निकालानंतर राडा पाहायला मिळाला. (Big blow to Narayan Rane in Sindhudurg; Great success for Shiv Sena in Nagar Panchayat elections)

राणे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. याठिकाणी चारपैकी दोन नगरपंचायतींमध्ये शिवसेना आणि काँग्रेसने नारायण राणे यांच्या वर्चस्वाला धक्का दिला आहे.  गेल्या निवडणुकीत एकही उमेदवार नसलेल्या देवगड नगरपंचायतीमध्ये शिवसेनेने प्रथमच आठ जागांवर विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर विजय मिळवला आहे. भाजपनेही आठ जागांवर विजय मिळवला असला तरी शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे देवगड नगरपंचायतीवर सेना - राष्ट्रवादीच सत्ता येणार आहे. 

देवगड नगरपंचायत निवडणुकीमध्ये नितेश राणेंच्या हातून सत्ता गेलीय. देवगड नगरपंचायत मध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. भाजपची सत्ता असणाऱ्या या नगरपंचायतीमध्ये शिवसेनेला आठ व भाजपाला आठ अशा समसमान जागा मिळाल्या आहेत. दोन्ही पक्षांचे प्रत्येकी आठ उमेदवार निवडून आले आहेत. तसेच राष्ट्रवादीचा एक उमेदवार निवडून आल्याने या ठिकाणी नक्की सत्ता कोणाची यावर शिक्कामोर्तब निकाल लागल्यानंतरही झालेलं नाही.
  
तर कुडाळ नगरपंचायतीमध्ये भाजपने 8 जागांवर विजय मिळवला. तर शिवसेनेला 7 आणि काँग्रेसला दोन जागा मिळाल्या. त्यामुळे काँग्रेसने मदतीचा हात पुढे केल्यास याठिकाणीही भाजपची सत्ता जाणार, हे स्पष्ट दिसत आहे. नगर पंचायत निवडणूक 2022 मध्ये शिवसेनेने विजय मिळवल्याने भाजपला मोठा धक्का बसला असून राणेंनाही पराभवाचा या निवडणुकी सामना करावा लागला आहे. येथे शिवसेनेने बाजी मारत राणेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.