तुम्हाला तुमच्या आमदारांवरच विश्वास नाही; एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीवर भाजपनेत्याचा ठाकरेंना टोला

राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवनिर्वाचित आमदार आणि खासदारांना शुभेच्छा दिल्या. 

Updated: Jun 21, 2022, 03:35 PM IST
तुम्हाला तुमच्या आमदारांवरच विश्वास नाही; एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीवर भाजपनेत्याचा ठाकरेंना टोला title=

मुंबई : राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवनिर्वाचित आमदार आणि खासदारांना शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यकर्त्यांचे आभार मानले. राज्यसभेसाठी भाजपने 2 जागा लढवण्याचा प्रस्ताव मविआकडून आला होता. परंतू अनेक गोष्टींमुळे आम्ही 3 री जागा मागा घेतली नाही. या निवडणुकीमुळे अपक्ष आमदारांचं महत्व महाविकास आघाडीला कळलं. अन्यथा त्यांना कधीही मुख्यमंत्री किंवा मंत्री वेळ देत नसल्याचं चित्र होतं. परंतू निवडणुकीच्या निमित्ताने ते वारंवार भेटी द्यायला लागले.असे पाटील यांनी यावेळी म्हटलं. 

या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीमधील खदखद दाखवून देण्यास भाजप यशस्वी ठरली. राज्यसभा निवडणूकीला 123 आमदारांनी भाजपला मतदान केलं. आणि विधानपरिषदेला तर 134 आमदारांनी भाजपच्या उमेदवारांना मतदान केलं. 

गुप्तमतदान पद्धतीला महाविकास आघाडी घाबरते. त्यामुळे त्याच्यातील खदखद बाहेर येण्यास वाव मिळतो. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक अद्याप झालेली नाही. त्यांची हिम्मतच होत नाही. नंतर कायदा बदलला की, हात वर करून मतदान करायचं.

तुम्हाला तुमच्या आमदारांवर विश्वासच नसेल तर, काय उपयोग. राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपची ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाली. या निवडणुका जिंकण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचे नियोजन तंतोतंत यशस्वी ठरले. असे पाटील यांनी म्हटले.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर भाष्य...

एकनाथ शिंदे यांच्या मुद्द्यांवर बोलताना पाटील म्हणाले की, आता याविषयी आम्ही काही बोलणार नाही. आम्हालाही काल सायंकाळी कळलं की, काही लोकं बाहेर पडली आहेत. नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे पुढे काय गोष्टी होतात. हेही आम्ही पाहत आहोत.

अनेक सेना आमदारांच्या मनात ही खदखद होती की, त्यांना हिंदुत्व सोडून काम करता येणार नाही. त्यामुळे ही परिस्थिती सध्या सेनेची दिसतेय.