एका त्रस्त पालकाचे विनोद तावडेंना पत्र, सोशल मीडियावर व्हायरल

शाळेत जाणाऱ्या पाल्याच्या पालकाचे काय दु:ख असते, हे एका पालकाने शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना एक भलेमोठे पत्र पाठवून व्यक्त केलेय. हे पत्र सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.

Updated: Oct 16, 2015, 09:37 AM IST
एका त्रस्त पालकाचे विनोद तावडेंना पत्र, सोशल मीडियावर व्हायरल title=

मुंबई : शाळेत जाणाऱ्या पाल्याच्या पालकाचे काय दु:ख असते, हे एका पालकाने शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना एक भलेमोठे पत्र पाठवून व्यक्त केलेय. हे पत्र सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.

विनोद तावडे यांनी आधी मुलांच्या पाठिवरचे ओझे कमी, करण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करुन चाचणी घेतली. आता हे ओझे कधी कमी होणार, याकडे लक्ष लागले असताना सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या पत्राला विनोद तावडे, हे उत्तर देतील का, असा सवाल विचारण्यात येत आहे. 

त्रस्त पालकाचे तसेच्या तसे पत्र:
आदरणीय श्री. विनोदजी तावडे यांस,
आपले काही दिवसांपूर्वीचे पोस्ट वाचली आणि आपण सुशिक्षित असल्याची खात्री पटली. आम्ही सुद्धा काही प्रमाणात शिक्षित आहोत आणि आमच्या मुलांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय.

आपण शिक्षण क्षेत्रात बरेच काम करत असल्याने आमच्या काही खालील प्रश्नांची उत्तरे आपण काहीअंशी देऊ शकाल असे वाटले म्हणून हा पत्रप्रपंच.

१) Nursery, Jr. KG ते अगदी दुसरी-तिसरीच्या (म्हणजे वय वर्ष ३ ते 8) या मुलांकडून विविध प्रोजेक्ट करुन घेण्याचे फर्मान कुठल्या शहाण्या शिक्षणतज्ज्ञाने सुचविले आणि कोणत्या उद्देशाने?

२) या वयात मुलांना कैची (कात्री) हातात धरता येत नाही हे समजण्यासाठी कोणत्याही तज्ज्ञाची गरज आहे का?

३) यातील जवळजवळ सर्व activities आणि projects बिचारे पालक आपला कामधंदा संपवून घरी येऊन करतात हे आपणास माहीत आहे का?

४) हे projects बनवून आणण्यासंबंधी पालकांना शाळा सुटल्यावर म्हणजे संध्याकाळी कळते आणि ते पालकांना आपली इतर कामे सांभाळून एका रात्रीत पुर्ण करुन द्यावे लागतात, याची तुम्हा धोरणी लोकांना कल्पना आहे का?

५) Stationary दुकानवाल्यांकडे शाळेने सांगितलेले सर्व साहित्य ताबडतोब मुबलक प्रमाणात उपलब्ध असते, हा निव्वळ योगायोग समजावा का?

६) शाळामध्ये काही विचारणा केल्यास 'या प्रकारचे शिक्षण देण्याची सरकारी notification असल्याचे सांगितले जाते. म्हणजे शाळासुद्धा ही पद्धत नाइलाजास्तव अवलंबते असे वाटते. खरे काय ते फक्त शिक्षणखातेच जाणे.

७) आपल्या शिक्षकांनी कधी आपल्याकडून अशा पद्धतीने अभ्यास करुन घेतल्याचे आपल्याला आठवते का? तसे न केल्याने शैक्षणिक पातळीवर आपल्याला काही नुकसान झाले आहे का?

८) मला  माहित असलेले ९९% पालक शाळेत सांगितलेले सर्व प्रोजेक्ट स्वतः करतात कारण हे सर्व प्रोजेक्ट मुलांच्या आवाक्याबाहेरचे असतात. आता पालकांनी आपल्या पोटा-पाण्याची सोय करावी की मुलांचे प्रोजेक्ट करत बसावे ?

९) जर गणित जुळवले तर या कमी गरजेच्या activities चा वार्षिक खर्च प्रत्येक मुलामागे सुमारे १५,०००/- आहे. म्हणजे हे business syndicate हजारो कोटींचे आहे, याची कोणाला कल्पना आहे काय? किंवा काही बड्या धेंडांच्या सरकारबरोर संगनमताने हे चालले आहे असे समजावे?

१०) या प्रोजेक्ट व्यतिरिक्त, मोठी प्रकाशनगृहे मुळ अभ्यासक्रम सोडून इतर अनेक पुस्तके शाळांच्या मदतीने (किंमत सुमारे ८००/-) मुलांच्या माथी मारते, हे आपण जाणता का?

११) मुले ही देवाघरची फुले असे मानल्यास त्यांच्या पालकांना अतिरिक्त शारीरिक आणि आर्थिक बोजा टाकून देवाघरी पाठवण्याचा शिक्षण खात्याचा मानस आहे का?

या सर्व प्रश्नांची उत्तरे आपणासारख्या सुधारकांना माहित नसतील तर नवलच. तरी शिक्षण क्षेत्रातील नामांकित व्यक्तींनी एकत्र येऊन शिक्षणाचे हे बाजारु रूप पालटायला हवे.

कुठे पाटी-पेन्सिलने केलेला, मनापासून शिकविलेला आणि शिकला गेलेला अभ्यास आणि कुठे कॉम्पूटरशिवाय होत नसलेला, शिक्षकांनी फक्त वाचून दाखवलेला, पालकांनी मजबुरी म्हणून करून दिलेला  अभ्यास?

मला खात्री आहे लहान मुलांचे सगळे पालक या शिक्षणपद्धतीमुळे आणि स्वतःवर आणि मुलांवर येणाऱ्या या बोजामुळे त्रस्त आहेत आणि ते माझ्या मताशी सहमत असतील.

तरी आपण मुलांच्या दप्तरांची ओझी कमी करण्यासोबत, मुलांच्या आणि पालकांच्या मानसिक आणि आर्थिक (अनुक्रमे) स्थितीत सुधारणा आणण्याचा प्रयत्न करा. विचार करून बघा की तुमच्या / आमच्या engineering ला जितका खर्च आला नव्हता तेवढा खर्च आता सर्व पालक फक्त आपल्या चिमुरड्यांच्या प्रोजेक्टवर खर्च करत आहेत.

चूक-भूल क्षमस्व.
आपला नम्र,
एक त्रस्त पालक

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.