नागपुरात गुंडाराज

नागपूरात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे ! शहरात गुंडाचा हैदोस ! नागरिकांचे भीतीचे वातावरण !

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 19, 2013, 12:05 AM IST

www.24taas.com, मुंबई
बुधवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास रस्त्याने जाणा-या तरुणीची दोघांनी छेड काढली..त्या तरुणीने त्या विषयी आपल्या मित्राला सांगितलं..तिचा मित्र मदतीसाठी गेला खरा पण तिथ असलेल्या गुंडांनी जाब विचारण्यासाठी आलेल्या तरुणाची गोळी घालून हत्या केली..भररस्त्यात ही घटना घडल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय..
गेल्या चोवीस तासात नागपूर शहरात ज्या गुन्ह्याच्या घटना घडल्यात त्या पहाता शहरात कायदा आणि सुव्यवस्था आहे का ? असा प्रश्न पडल्या शिवाय राहात नाही...त्या दोन घटनांमुळे नागपूरकर अक्षरश: हादरुन गेलेत...
बुधवारी संध्याकाळी पहिली घटना घडली...रोशन समरीत या तरुणाचा गोळी घालून खून करण्यात आलाय...रोशनच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री मामाकडं निघालेल्या रोशनला त्याच्या मैत्रिणीचा फोन आला...
दोघांनी रोशनच्या मैत्रिणीला वाटेत आडवून तिची छेड काढली तसेच तिच्या फोननंबर साठी त्या दोघांनी तिच्याकडं तगादा लावला होता...त्याचवेळी रोशन तिथं पोहोचला तेव्हा तिची छेड काढणारे आरोपी तिथच होते...
रोशनला गोळी घातल्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केलाय. एकूलत्या एक मुलाच्या मृत्यूमुळे समरीत कुटुंबाला मोठा धक्का बसलाय. तसेच रात्री सात- सव्वा सात वाजण्याच्या सुमारास वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडल्यामुळे नागरीकमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय..
तरुणाच्या खुनाची घटना ताजी असतांना मोटरसायकल वरुन जाणा-या गुंडांनी पोलीस पथकावर गोळीबार केला. एकापोठोपाठ एक घडलेल्या या गुन्ह्यांच्या घटनांमुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक राहिला नसल्याचं चित्र निर्माण झालंय.
नागपूरातील जनगाडे चौकात बुधवारी रात्री आणखी एक गुन्हा घडला... पोलीस पथक गस्तीवर असतांना मोटरसायकलवरुन जात असलेल्या तिघांचा पोलिसांना संशय आला...पोलिसांनी त्या मोटरसायकलस्वारांना थांबवून त्यांच्याकडं चौकशी केली. मात्र त्या तिघांनी पोलीस पथकावरच गोळीबार केला..
त्या तिघांशी पोलिसांची झटापट झाली...त्यात पोलिसांनी मोईन अन्सारी नावाच्या आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळवलंय ..त्या आरोपीकडून पोलिसांनी शस्त्र जप्त केलीत.
पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या दोघांपैकी राजा गौस नावाच्या आरोपीने पोलिसांवर गोळीबार केल्याचं तपासात उघड झालंय..तसेच आरोपी राजा गौसने वाटेत सचिन पिंपळे नावाच्या एका युवकाला चाकूचा धाक दाखवून त्याची मोटरसायकल पळवून नेली....पुढे त्या मोटरसायकलचं पेट्रोल संपल्यानंतर अतुल राघोर्ते नावाच्या व्यक्तीची मोटरसायकल घेऊन राजा गौस फरार झाला. नागपूरमधील सध्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर माजी पोलीस महासंचालकांनी चिंता व्यक्त केलीय..

गुंडाना जरब बसवायचा असेल तर फौजदारी कायद्यात सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचं मत चक्रोबोर्ती यांनी व्यक्त केलंय. नागपूरात एकापाठोपाठ एक घ़डत असलेल्या गुन्ह्यांच्या घटनांमुळे नागरिकांची चिंता वाढलीय.