अखेर तृणमूलचा यूपीएशी काडीमोड

तृणमूल काँग्रेसच्या सहा मंत्र्यांनी अखेर पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केलाय. दुपारी साडेचारच्या सुमारास तृणमूलचे मंत्री पंतप्रधानांच्या निवासस्थानी ७ रेसकोर्सला पोहचले.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 21, 2012, 04:59 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
तृणमूल काँग्रेसच्या सहा मंत्र्यांनी अखेर पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केलाय. दुपारी साडेचारच्या सुमारास तृणमूलचे मंत्री पंतप्रधानांच्या निवासस्थानी ७ रेसकोर्सला पोहचले.
रिटेल क्षेत्रात ५१टक्के एफडीआयला मान्यता देण्याच्या विरोधात या मंत्र्यांनी आपला राजीनामा दिलाय. यानंतर टीएमसीचे नेते राष्ट्रपती प्रणव मुखर्जींची भेट घेण्यासाठी गेलेत. तृणमूलनं यूपीएमधून काडीमोड घेतला असला तरी यूपीए सरकारला मात्र कोणताही धोका नाही. यूपीएला बहुमतासाठी २७१ चा आकडा गाठण्याची आवश्यकता आहे. तृणमूल बाजूला होऊनही सध्या यूपीएकडे आवश्यक असलेलं संख्याबळ आहे.
दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या मंत्र्यांच्या राजीनाम्यामुळं आपण दु:खी असल्याचं पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटलंय. राजीनाम्याची घोषणा करण्याआधी रेल्वेमंत्री मुकूल रॉय यांनी म्हटलं होतं की, तृणमूल काँग्रेसचे मंत्री अगोदर पंतप्रधान कार्यालयात जातील आणि आपला राजीनामा सादर करतील. यानंतर ते राष्ट्रपतींची भेट घेतील. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी तीन दिवसांआधीच आपल्या पक्षाचे मंत्री राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं होतं.