'दोन विमाने पाडल्याचे पाकिस्तानचे वृत्त खोटे, आमचे पायलट सुरक्षित'

भारतीय वायु सेनेची दोन विमाने पाडल्याचा दावा पाकिस्तान कडून करण्यात आला होता. हा दावा भारतातर्फे फेटाळण्यात आला आहे.

Updated: Feb 27, 2019, 03:10 PM IST
'दोन विमाने पाडल्याचे पाकिस्तानचे वृत्त खोटे, आमचे पायलट सुरक्षित'  title=

नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांच्या खात्मा केला. भारताचे हे कृत्य पाकिस्तानच्या जिव्हारी लागले आहे. भारत-पाकिस्तान सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान पाकिस्तानची तीन विमाने भारतीय हद्दीत घुसली होती. याचे उत्तर देताना पाकचे एक विमान पाडण्यात भारताला यश आले. दरम्यान भारतीय वायु सेनेची दोन विमाने पाडल्याचा दावा पाकिस्तान कडून करण्यात आला होता. हा दावा भारतातर्फे फेटाळण्यात आला आहे. दोन विमाने पाडल्याचे पाकिस्तानचे वृत्त खोटे असून आमचे पायलट सुरक्षित असल्याचे भारतीय लष्करातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 

 भारतीय वायुदलाच्या एका जवानाला अटक केल्याचंही पाकिस्तान सैन्यदलाचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी सांगितले. पाकिस्तानी मीडियामध्येही हे वृत्त सतत दाखवले जात आहे. सकाळी भारतीय वायुदलाकडून पुन्हा एकदा नियंत्रण रेषा ओलांडण्यात आल्याचं गफूर यांनी सांगितले. याच ट्विटमध्ये त्यांनी पाकिस्तानच्या हवाईदलाकडून भारतीय वायुदलाच्या विमानांवर हल्ला केल्याचेही सांगितले. भारताच्या दोन विमानांना पाकिस्तानच्या हवाई हद्दीत निशाणा करत त्यातील एक विमान खाली पडच्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. एक विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये आणि दुसरे भारतीय हद्दीतील काश्मीरध्ये पडल्याचे सांगत पाकिस्तानच्या हद्दीत एका भारतीय वैमानिकाला अटक केल्याचा दावा पाकतर्फे करण्यात आला होता. हा दावा खोटा असल्याचे भारतीय लष्करातर्फे म्हटले आहे. 
   

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये उदभवलेली परिस्थिती सध्या अतिशय तणावाच्या वळणावर आलेली असून, पाकिस्तानकडून वारंवार भारतीय वायुदलाचा हल्ला परतवून लावण्याची क्षमता आपल्या सैन्यात असल्याचा दावा करण्यात येत आहे. एएनआयने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार पाकिस्तनच्या वायुदलाने नियंत्रण रेषेपलीकडे काही हल्ले केले असून, भारताच्या हल्ल्याचं उत्तर देत आत्मसंरक्षणाचा हक्क असल्याचंच या माध्यमातून आम्हाला दर्शवायचं होतं, असं MoFA प्रवक्ते मोहम्मद फैजल म्हणाले.

 

याआधी भारतीय वायुसेनेने केलेल्या कारवाईत जैश ए मोहम्मदचे 300 दहशतवादी मारले गेले. एवढंच नव्हे जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरचा जावई युसूफ अजहरला ठार करण्यात आले. भारतीय वायुसेनेने 12 मिराज फायटरच्या मदतीने साधारण 1000 किलो बॉम्बचा वर्षाव करण्यात आला होता. 14 फेब्रुवारीला भारतीय लष्करावर झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये भारताचे 40 जवान शहिद झाले आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.