काश्मिरात तिरंगा असुरक्षित, हा भाजपचा पराभव - शिवसेना

 लडाख कौन्सिलच्या निवडणुका भाजपने जिंकल्या व त्याचा विजयोत्सवही साजरा केला. पण मुख्य कश्मीरात तिरंगा फडकवता येत नाही हा पराभव आहे.  

Updated: Oct 28, 2020, 08:41 AM IST
काश्मिरात तिरंगा असुरक्षित, हा भाजपचा पराभव - शिवसेना  title=

मुंबई : शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्या भूमीवर तिरंगा फडकायला पाहिजे, ते तो फडकत नाही. हा भाजपचा पराभव आहे. काश्मिरातील अनुच्छेद ३७० हटवल्यावर नक्की बदलले काय, असा सवालही शिवसेनेने आपले मुखमत्र दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपला विचारला आहे. केवळ मुंबईला पाक व्याप्त काश्मीर म्हणणाऱ्या नटीला संरक्षण आणि आपला तिरंगा असुरक्षित, असेच हे चित्र. कश्मिरात सध्या राष्ट्रपती राजवट आहे. म्हणजे तेथे दिल्लीचा हुकूम चालतो, पण लाल चौकात तिरंगा फडकवणे हा गुन्हा ठरला. याला काय म्हणावे, असे शिवसेनेने म्हटले आहे. हा भाजपचा झालेला पराभव आहे, अशी टीका 'सामना'तून करण्यात आली आहे.

तेथेच तिरंग्याचा अपमान होतो..

कश्मिरात सध्या राष्ट्रपती राजवट आहे. तेथील अनुच्छेद ३७० हटवले आहे. तरीही तेथे बदल काय झालाय? हिंदुत्वाचा संबंध राष्ट्रीयत्वाशी येतो. एखाद्या भूमीवर तिरंगा फडकवण्यास बंदी आहे याचा सरळसोट अर्थ असा की, त्या भूमीचे आम्ही स्वामी नाही! त्या भूमीवर दुसऱ्याच कुणाचा तरी हुकूम चालत आहे. ते हुकूमबाज एकतर दहशतवादी आहेत अथवा परके आहेत. मुंबईत आजही तिरंगा फडकत आहे. म्हणजे हा भाग पाकड्यांचा नाही. जेथे पाकड्यांची मिजास चालते तेथेच तिरंग्याचा अपमान होतो. नकट्या नटीने लाल चौकातील न फडकलेल्या तिरंग्यासाठी संतापाच्या ठिणग्या उडवाव्यात. खरी मर्दानगी आणि मर्दानी तेथेच आहे, असे टोला कंगनाला नाव न घेता लगावला आहे.

कश्मीरात नक्की काय सुरू आहे याबाबत शंकाकुशंकांना खतपाणी मिळणाऱ्या घटना, घडामोडी रोज घडताना दिसत आहेत. कश्मीरबाबत देशवासीयांच्या भावना तीव्र आहेत. काँग्रेसच्या काळात काश्मीर हातातून गेलेच होते ते भाजपने परत मिळवले. हे जे सांगितले जाते, ते खरे असेल तर श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्यास विरोध का करण्यात आला? याचे उत्तर देशाला मिळायला हवे, असा रोखठोक प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे.

तिरंगा फडकवणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना रोखले

काश्मीर हा हिंदुस्थानचाच अविभाज्य भाग आहे, हे सिद्ध करण्यासाठीच मोदी सरकारने अनुच्छेद ३७० हटवून काश्मीरच्या पायांतील गुलामीच्या बेड्या तोडून फेकल्या. त्याबद्दल सगळ्यांनीच कौतुकाचा वर्षाव केला. अनुच्छेद ३७० हटवून भारतमातेचा गुदमरलेला श्वास मोकळा केला. हे सर्व मोदी व शाह यांचे राज्य दिल्लीत असल्यामुळेच घडले, पण अनुच्छेद ३७० हटवूनही भाजप कार्यकर्त्यांना चारेक दिवसांपूर्वी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवता आला नाही. लाल चौकात तिरंगा फडकवण्यास गेलेल्या भाजप कार्यकर्त्यांना काश्मीरच्या पोलिसांनी रोखले आणि बंदी बनवले. हे चित्र काय सांगते? म्हणजेच काश्मीरची स्थिती अजूनही सुधारलेली नाही. जे बरे दिसत आहे तो फक्त वरवरचा मेकअप आहे, असा हल्लाबोल शिवसेनेने केला आहे.

हा सरळसरळ राष्ट्रद्रोहच

आता कश्मीरातील तीन प्रमुख पक्ष एकत्र आले आहेत व त्यांनी अनुच्छेद ३७० पुन्हा आणण्यासाठी लढा उभारण्याचे ठरवले आहे. डॉ. फारुख अब्दुल्ला या बेडकाने तर ‘डराव डराव’ करत असे जाहीर केले की, अनुच्छेद ३७० पुन्हा आणण्यासाठी आम्ही चीनची मदत घेऊ. हा सरळसरळ राष्ट्रद्रोहच आहे. दुसरी ती बेडकीण मेहबुबा मुफ्ती. तिने तर ‘कश्मीरात तिरंगा कसा फडकतो ते पाहू’ असे आव्हान दिले आहे. या दोन्ही नेत्यांची भाषा फुटीरतेची आणि चिथावणीची आहे. तिरंग्याचा अवमान भारतीय कधीच सहन करणार नाही. ही देशभावना आहे, असा इशाराही शिवसेनेने दिला आहे.

तिरंगा फडकवण्यासाठी संघर्ष  

 गेल्या ५ ऑगस्टला घटनेतील अनुच्छेद ३७० हटवले गेले. तोपर्यंत जम्मू-कश्मीरला वेगळे निशाण आणि वेगळे संविधान होते आणि हा प्रकार भारतमातेच्या काळजात सुरी खुपसल्याप्रमाणे वेदना देत होता. या दोन तरतुदींमुळे जम्मू-कश्मीर हे भारताच्या नकाशावर असूनही भारताच्या पोटातील स्वतंत्र राष्ट्र म्हणून डरकाळ्या फोडीत होते. मोदी-शहा यांनी हे स्वतंत्र राष्ट्र बरखास्त केले हे खरे. पण आजही काश्मिरात तिरंगा फडकवण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल तर कसे व्हायचे? अनुच्छेद ३७० हटविल्यानंतरही स्थिती ‘जैसे थे’ आहे व लोकांवर बंधने आहेत. लष्कराचा बंदोबस्त पूर्वीपेक्षा जास्त वाढला आहे. दहशतवादी हल्ल्यांचे भयही जास्त निर्माण झाले आहे. अनुच्छेद ३७० हटवताच काश्मिरी पंडितांची घरवापसी होईल, पंडितांना त्यांचा जमीनजुमला परत मिळेल असे वातावरण भाजपने निर्माण केले. प्रत्यक्षात किती पंडितांची घरवापसी झाली हे गौडबंगाल आहे, असा भाजपवर शिवसेनेने आरोप केला आहे.  

एक रुपयाचीही गुंतवणूकही नाही!

भारतीय जनता पक्षाचे काम करणाऱ्यांच्या हत्या याच काळात केल्या गेल्या, हे दुर्दैव आहे. अनुच्छेद ३७० असताना बाहेरच्या लोकांना येऊन तेथे एक इंच जमीन घेता येत नव्हती. बाहेरच्यांना तेथे जाऊन उद्योग, व्यापार करता येत नव्हता. त्यामुळे अनुच्छेद ३७० काढल्यानंतर तेथे व्यापार, उद्योग वाढेल असे चित्र निर्माण केले होते. काही बडय़ा उद्योगपतींनी देशभक्तीने प्रेरित होऊन कश्मीरात मोठी गुंतवणूक करण्याचेही जाहीर केले, पण वर्ष उलटून गेले तरी तेथे एक रुपयाचीही गुंतवणूक होऊ शकलेली नाही. बेरोजगारीने वैफल्यग्रस्त झालेले तरुण पुन्हा जुन्याच अतिरेकी मार्गाने निघाले आहेत व ‘३७०’ प्रेमी पुढारी या तरुणांची डोकी भडकवीत आहेत. कश्मीरातून लेह, लडाख बाजूला काढले. त्या लडाख कौन्सिलच्या निवडणुका भाजपने जिंकल्या व त्याचा विजयोत्सवही साजरा केला. पण मुख्य कश्मीरात तिरंगा फडकवता येत नाही हा पराभव आहे.