मुंबईत रात्रभर मुसळधार; कोकणासह राज्यात अतिवृष्टीचा इशारा

सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम   

Updated: Jul 5, 2020, 07:24 AM IST
मुंबईत रात्रभर मुसळधार; कोकणासह राज्यात अतिवृष्टीचा इशारा  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : शुक्रवारपासून सुरु झालेल्या पावसाळी वातावरणाचं चित्र राज्यात अद्यापही पाहायला मिळत आहे. शनिवारी चांगलाच जोर पकडलेल्या पावसाचा मुंबई आणि कोकण भागात असणारा जोर सलग दुसऱ्या दिवशीही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. शनिवारी रात्रभर मुसळधार सुरु असणाऱ्या पावसामुळं रविवारी सकाळच्या सुमारास मुंबई आणि इतर परिसरांमधील सखल भाग जलमय झाल्याचं पाहायला मिळालं. 

दरवर्षी पावसाळ्यामध्ये पाणी साचणाऱ्या हिंदमाता आणि दादर भागात या दोन दिवसांच्या पावसानं पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. काही भागांमध्ये झाडं उन्मळून पडल्याच्या घटना घटल्या. पण, कोरोना व्हायरसमुळं सुरु असणाऱ्या लॉकडाऊनमुळं रस्त्यांवर गर्दी कमी असल्यामुळं मोठा धोका टळला. 

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील गर्दी तुलनेनं कमी झाल्यामुळं वाहतूक कोंडीची समस्याही बऱ्याच अंशी कमी असल्याचंही पाहायला मिळालं. पण, अत्यावश्यक सेवांमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र अतिवृष्टीमुळं बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. जोरदार पावसामुळं आठवड्याअखेरीस काहीशी संथ झालेली मुंबई पुन्हा पूर्वपदावर येत असतानाच तिथे कोकण किनारपट्टी भागातही वरुणराजाची दमदार हजेरी पाहायला मिळाली. 

 

कोरोना लसीच्या उत्पादनावरून होणाऱ्या वादांवर ICMR चा मोठा खुलासा

 

कल्याण - डोंबिवली आणि राज्याच्या इतरही भागांमध्ये सध्या मान्सून चांगलाच सक्रिय झाला आहे. परिणामी मान्सूकडे चातकाप्रमाणे डोळे लावून बसलेल्या बळीवराजावर आलेलं दुबार पेरणीचं संकट टळलं आहे. त्यामुळं आता शेतीच्या पुढील कामांनाही येत्या काही दिवसांमध्ये सुरुवात होणार आहे.