अलाहाबाद दुर्घटनेत २२ ठार, १० जण जखमी

कुंभमेळाव्याला आलेल्या भाविकांवर दुखाचा डोंगर कोसळला. अलाहाबाद रेल्वे स्टेशनवर झालेली गर्दी आणि फलाटाचा कठडा कोसळून झालेल्या अपघातात २२ जण ठार तर १० जण जखमी झालेत. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 11, 2013, 07:39 AM IST

www.24taas.com,अलाहाबाद
कुंभमेळाव्याला आलेल्या भाविकांवर दुखाचा डोंगर कोसळला. अलाहाबाद रेल्वे स्टेशनवर झालेली गर्दी आणि फलाटाचा कठडा कोसळून झालेल्या अपघातात २२ जण ठार तर १० जण जखमी झालेत. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
अलाहाबादमध्ये कुंभमेळा भरलेला असून रविवारी शाही स्नान असल्यानं कोट्यवधी भाविक गंगेत डुबकी मारण्यासाठी अलाहाबादेत जमले होते. त्यावेळी रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी झाली होती. प्लॅटफॉर्म नंबर सहावरचा फूटओव्हर ब्रीजचा कठडा तुटल्यानं ही दुर्घटना घडलीय.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं असून सर्व प्रशासकीय यंत्रणांना तात्काळ मदतीचे आदेशही त्यांनी दिलेत. तसंच रेल्वेमंत्र्यांनी दुर्घटनेसाठी तात्काळ हेल्पलाईन सुरु करण्याचेही आदेश दिले आहेत.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश देत पीडितांना मदतीची घोषणा केलीय.
दरम्यान या घटनेनंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. प्लॅटफॉर्म नंबर६ वरचा कठडा कोसळल्यानं हा चेंगराचेंगरी होऊन हा अपघात घडल्याचं बोललं जातंय.. त्यामुळं या घटनेला रेल्वे जबाबदार असल्याचा आरोप होतोय. दुसरीकडे रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी हे आरोप फेटाळलेत.