हवामान बदलाने कोकणातील आंबा, काजू पिक धोक्यात

कोकणात गेले दोन दिवस काही भागात पावसाच्या हलक्या सरींबरोबरच वातावरण ढगाळ झालं आहे. या बदललेल्या वातावरणाचा फटका हापूसला बसण्याची शक्यता आहे. सध्या आंब्याचा मोहोर तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 22, 2014, 11:15 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी
कोकणात गेले दोन दिवस काही भागात पावसाच्या हलक्या सरींबरोबरच वातावरण ढगाळ झालं आहे. या बदललेल्या वातावरणाचा फटका हापूसला बसण्याची शक्यता आहे. सध्या आंब्याचा मोहोर तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
थंडीही वाढली आहे. मात्र, वातावरणातील अचानक झालेल्या बदलामुळे हापूसच्या मोहोरवर तूडतुड्या जातीचा रोग पसरण्याची शक्यता व्यक्त होतेय. आंब्याचा मोहोर वाचवण्यासाठी बागायतदारांची धडपड सुरू आहे.
आठवडाभर पडलेल्या कडाक्‍याच्या थंडीने आंबा-काजूचा मोहोर बहरलेला असतानाच ढगाळ वातावरणाने या मोहोरावर संक्रांत येण्याची चिन्हे आहेत. मोहोर वाचविण्यासाठी फवारणी केली जात असली तरी त्याचा फारसा लाभ होण्याच शक्यता कमी आहे.
दाट धुके आणि कडाक्‍याची थंडी अशा पोषक वातावरणाने डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून कोकणात आंबा-काजूला मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. गेल्या आठ दिवसांत थंडीचा कडाका वाढल्यावर खाडी भागाप्रमाणेच इतर भागातील आंबा आणि काजूची झाडे अक्षरशः मोहोराने लगडली होती. यावर्षी वेळेत आलेला मोहोर आणि निसर्गाची लाभलेली साथ यामुळे आंबा आणि काजू विनाव्यत्यय हाती येणार या अपेक्षेत असणाऱ्या शेतकरी आणि बागायतदारांच्या स्वप्नावर गेले दोन दिवस असलेल्या ढगाळ वातावरणाने पाणी फेरले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.