टीम इंडियात बदलाचे वारे! रोहित शर्मानंतर कसोटी कर्णधारपदासाठी 'या' दोन खेळा़डूंची नावं

Team India : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीबीसीआयने भारतीय संघाची घोषणा केलीय. विशेष म्हणजे क्रिकेटच्या तीन फॉर्मेटसाठी तीन वेगवेगळे कर्णधार नियुक्त केले आहेत. यानिमित्ताने भारतीय क्रिकेटमध्ये बदलाचे वारे वाहू लागल्याचं बोललं जातंय.

राजीव कासले | Updated: Dec 5, 2023, 05:36 PM IST
टीम इंडियात बदलाचे वारे! रोहित शर्मानंतर कसोटी कर्णधारपदासाठी 'या' दोन खेळा़डूंची नावं title=

Team India : भारतीय क्रिेकटमध्ये सध्या बदलाचे वारे वाहातायत. आयसीसी एकदिवसीय विश्वचषकानंतर टीम इंडियाचा (Team India) कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) भविष्याबाबत प्रश्नचिन्हा उपस्थित झाला आहे. याचं मुख्य कारण म्हणजे रोहितचं वाढतं वय. रोहित शर्मा 37 वर्षांचा आहे. त्यामुळे आणखी किती काळ क्रिकेटच्या तीनही फॉर्मेटमध्ये तो खेळू शकेल? हा मोठा प्रश्नच आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीसीसीआयने (BCCI) तीन वेगवेगळे कर्णधार देत तसे संकंतच दिले आहेत. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी20, एकदिवसीय आणि कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने तीन कर्णधारांची निवड केली आहे. यानिमित्ताने बीसीसीआयकडून रोहित शर्माचा पर्याय शोधला जात असल्याचं बोललं जात आहे. 

टीम इंडियात बदलाचे वारे
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी20 कर्णधारपदाची धुरा सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचाविरुद्ध पाच टी20 सामन्यांची मालिका 4-1 अशी जिंकलीय. याच कामगिरीच्या जोरावर त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही लॉटरी लागली आहे. तर एकदिवसीय कर्णधारपदाची जबाबदारी केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे. दोन कसोटी मालिकांसाठी टीम इंडियाची धुरा रोहित शर्माकडे आहे. पण रोहित शर्मानंतर कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व कोण करणार याचा शोध आतापासूनच सुरु झाला आहे. 

रोहित शर्मानंतर कर्णधार कोण?
टीम इंडियाचा माजी फलंदाज आणि क्रिकेट समालोचक आकाश चोपडा यांनी रोहित शर्मानंतर दोन खेळाडूंच्या नावाचं भाकित वर्तवलं आहे. आकाश चोपडाच्या मते शुभमन गिल (Shubman Gill) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) हे भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद सांभाळू शकतात. गिल आणि पंतमध्ये गेम बदलवणयाची ताकद आहे. ऋषभ पंत विकेटकिपर आणि गेमचेंजिंक खेळाडू आहे. ऋषभ पंतकडे टीम इंडियाचा भावी कसोटी कर्णधार म्हणून पाहिलं जात आहे. पण पंत कार अपघातात जखमी झाल्यानंतर काही गोष्टी बदलल्या आहेत. पंत क्रिकेटमध्ये कधी पुनरागमन करणार याची अद्याप शाश्वती नाही.

भारतीय संघातच्या कसोटी कर्णधारपदासाठी शुभमन गिलच्या नावाचा विचार करायचा झाल्यास तो आता फक्त 24 वर्षांचा आहे. आयपीएलमध्ये गिलला गुजरात टायटन्सचं कर्णधारपद सोपवलं आहे. पण त्याच्या कर्णधारपदाची परीक्षा अद्याप बाकी आहे. पण शुभमन गिल टीम इंडियात मोठ्या काळासाठी खेळणारा खेळाडू आहे. गिल संयमी आणि शांत स्वभावाचा आहे. त्यामुळे रोहित शर्मानंतर गिल कसोटी संघाचा भक्कम दावेदार असल्याचं आकाश चोपडाने सांगितलं. 

सीनिअर खेळाडूंना संधी?
विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्माकडे जबाबदारी सोपवण्यात आली. रोहित शर्मानंतर केएल राहुलच्या नावाची जोरदार चर्चा होती. पण कसोटी क्रिकेटमध्ये त्याला दमदार कामगिरी करता आलेली नाही. यानंतर जसप्रीत बुमराहलाही कसोटी कर्णधारपद देण्यात आलं. पण त्यानंतर त्याचं नावही मागे पडलं.