बाबरी विध्वंस : या दिवशी निर्णय, अडवाणींसह ३२ आरोपींना हजर राहण्याचे कोर्टाचे आदेश

बाबरी विध्वंस प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा निकाल ३० सप्टेंबरला येणार आहे.

Updated: Sep 16, 2020, 04:53 PM IST
बाबरी विध्वंस : या दिवशी निर्णय, अडवाणींसह ३२ आरोपींना हजर राहण्याचे कोर्टाचे आदेश title=

लखनऊ : बाबरी विध्वंस प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा निकाल ३० सप्टेंबरला येणार आहे. सीबीआयचे विशेष न्यायाधीश एस.के. यादव यांनी सगळ्या आरोपींना निकालाच्या दिवशी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील ३२ मुख्य आरोपींमध्ये माजी उप-पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंग विनय कटियार आणि उमा भारती यांचा समावेश आहे. 

सीबीआयचे वकील ललित सिंह यांनी सांगितलं की, दोन्ही पक्षांचा युक्तीवाद १ सप्टेंबरला संपला आहे. यानंतर विशेष न्यायाधीशांनी निर्णय लिहायला सुरुवात केली. 

सीबीआयने याप्रकरणी ३५१ साक्षीदार आणि ६०० कागदपत्र असलेले पुरावे न्यायालयात सादर केले. बाबरी विध्वंस प्रकरणी न्यायालयाचा निकाल २८ वर्षांनी येणार आहे. अयोध्येत ६ डिसेंबर १९९२ ला कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली होती.