कर्ज वसुलीसाठी SBI ची अनोखी आयडीया, फोन न उचलणाऱ्या ग्राहकांच्या थेट घरी पाठवले...

State Bank of India : कर्ज घेणारे ग्राहक अनेकवेळा बँकेचे फोन उचलत नाहीत. त्यामुळे कर्जाचे हफ्ते वसूल करण्यासाठी बँकेला अनेकवेळा ग्राहकाच्या घरापर्यंत चकरा माराव्या लागतात. पण आता अशा ग्राहकांसाठी एसबीआयने एक नवा उपक्रम सुरु केला आहे.

राजीव कासले | Updated: Sep 17, 2023, 09:48 PM IST
कर्ज वसुलीसाठी SBI ची अनोखी आयडीया, फोन न उचलणाऱ्या ग्राहकांच्या थेट घरी पाठवले... title=

State Bank of India : देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने कर्जदारांकडून विशेषता कर्जाचा हफ्ता (Loan) थकवणाऱ्या ग्राहकांकडून थकीत रक्कम नियमीत भरण्यासाठी एक अनोखा उपक्रम सुरु केला आहे. महिन्याच्या ठराविक तारखेला कर्ज न भरणाऱ्या ग्राहकांच्या घरी एसबीआय चॉकलेट (chocolates) पाठवत आहे. याबाबत बँकेने एका निवेदनात म्हटलंय कर्जाचे हफ्ते न भरणारे कर्जदार बँकेने आठवण करुन दिल्यानंतरही प्रतिसाद देत नाहीत, किंवा फोन उचलत नाही. अशा परिस्थितीत त्यांना न सांगता त्यांच्या घरी जाणं हा एक चांगला पर्याय आहे.

कर्ज वितरणात वाढ
व्याजदरात वाढ होत असताना किरकोळ कर्ज वितरणातही वाढ होत आहे. अशा स्थितीत कर्जवसुली चांगली व्हावी या उद्देशाने हे पाऊल उचललं जात असल्याचं बँकेने म्हटलं आहे. SBI चे किरकोळ कर्ज वाटप जून 2023 च्या तिमाहीत 16.46 टक्क्यांनी वाढून रुपये 12,04,279 कोटी इतकं झालं आहे.  गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत रुपये 10,34,111 कोटी इतकं होतं. बँकेचे एकूण कर्ज खाते 13.9 टक्क्यांनी वाढून 33,03,731 कोटी रुपये झाले आहे.

कर्ज वसूल करण्याचा उपक्रम
व्यवस्थापकीय संचालक अश्विनी कुमार तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार बँकेने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वापरणाऱ्या दोन फिनटेक (फायनान्शियल-टेक्नॉलॉजी) कंपन्यांची मदत घेतली आहे. त्यांच्या मदतीने किरकोळ कर्जदारांना त्यांच्या कर्जाच्या परतफेडीची आठवण करुन देण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबवला जात आहे. एक कंपनी कर्जदाराबरोबर समेट घडवून आणण्याचा  प्रयत्न करते. तर दुसरी कंपनी कर्जदाराच्या डिफ्लॉटरची माहिती देते. कर्ज थकवणाऱ्या ग्राहकाच्या घरी चॉकलेटचा एक डब्बा घेऊन बँकेचा कर्माचारी स्वत: त्या ग्राहकाची भेट घेतो आणि त्याला आदरपूर्वक कर्जाचे हफ्ते भरवण्याची विनंती करतो. 

पण बँक कर्मचारी ग्राहकाच्या घरी जाण्याची कोणताही आगाऊ कल्पना ग्राहकाला दिली जात नाही. अचानक भेट दिल्याने ग्राहक घरीच भेटतो. यात ग्राहकाला कोणतीही धमकी किंवा मारहाण न करतात कर्जाचे हफ्ते भरणं किती आवश्यक आहे याची आठवण करुन दिली जात असल्याचं अश्विनी कुामार तिवारी यांनी म्हटलंय. 

हा उपक्रम यशस्वी झाल्यास याची औपचारीक घोषणा केली जाणार असल्याचंही अश्विनी कुमार तिवारी यांनी सांगितलं.