'म्हणून ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतली', बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंचं स्पष्टीकरण

बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतली.

Updated: Sep 23, 2020, 07:44 PM IST
'म्हणून ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतली', बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंचं स्पष्टीकरण title=

पटणा : बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतली. सुशांतसिंह राजपूत प्रकरणामुळे गुप्तेश्वर पांडे चर्चेत आले होते. सेवानिवृत्तीनंतर पांडे राजकारणात प्रवेश करतील, अशीही चर्चा होती. या सगळ्या प्रश्नांवर गुप्तेश्वर पांडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 

'मागच्या २ महिन्यांमध्ये मला खूप त्रास देण्यात आला. या काळात माझं आयुष्य दयनीय झालं होतं. या काळात मला हजारो फोन आले आणि माझ्या निवृत्तीबद्दल विचारणा झाली. यामुळे मला कंटाळा आला होता,' असं गुप्तेश्वर पांडे म्हणाले. 

बिहार पोलिसांना मुंबईमध्ये चुकीची वागणूक देण्यात आली, बिहारच्या अस्मितेसाठी मी लढलो. सुशांत प्रकरणामुळे मी सेवानिवृत्ती घेतोय, असं कोणाला वाटत असेल, तर ते चुकीचं आहे. सेवानिवृत्ती घेणं हा माझा संविधानिक अधिकार आहे. मला फक्त सुशांतच्या म्हाताऱ्या वडिलांना मदत करायची होती. सुप्रीम कोर्टानेही बिहार पोलिसांना पाठिंबा दिला, अशी प्रतिक्रिया पांडे यांनी दिली. 

३४ वर्षांच्या माझ्या कारकिर्दीमध्ये मी कधीच गुन्हेगारांसोबत तडजोड केली नाही. ५० पेक्षा जास्त एन्काऊंटरमध्ये मी सहभागी झालो होतो. मी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केलेला नाही, तसंच याबाबतचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. राजकारणात प्रवेश न करताही मी सामाजिक कार्य करु शकतो, असं गुप्तेश्वर पांडे यांनी सांगितलं. 

गुप्तेश्वर पांडे १९८७ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवेचे अधिकारी होते. ३१ जानेवारी २०१९ रोजी गुप्तेश्वर पांडे बिहारचे डीजीपी बनले, ते सुशांत प्रकरणांबद्दल राष्ट्रीय चर्चेत आले. डीजीपी म्हणून गुप्तेश्वर पांडे यांचा कार्यकाळ २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत होता. अलीकडील काळात, ते वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत राहीले. बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधन प्रकरणात ते राष्ट्रीय पातळीवर चर्चेसाठी आले होते. सुशांत प्रकरणात रिया चक्रवर्ती यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याविरोधात प्रश्न उपस्थित केला असता गुप्तेश्वर पांडे यांनीही रिया संदर्भात औकात काढून वाद निर्माण केला.  नंतर, त्यांना यासाठी स्पष्टीकरण द्यावे लागले.

दरम्यान, राज्य सरकारने डीजीपीचा अतिरिक्त कार्यभार डीजी संजीव सिंघल, अग्निशमन सेवा आणि होमगार्ड यांना दिला आहे.