कर्जबाजारी होऊनही अनाथांना आधार देणारी माय

मीरा गणग- कदम ४० लेकरांची माय बनल्या आहेत.

Updated: Jan 19, 2020, 09:07 PM IST
कर्जबाजारी होऊनही अनाथांना आधार देणारी माय title=

गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : मराठवाड्यात २०१४-१५ ला भयाण दुष्काळ पडला. त्यातून हिंगोलीत आकाराला आलं ते आत्महत्या ग्रस्तांच्या मुलांना आधार देणार सेवासदन वस्तीगृह... जिल्हा परिषदेत शिक्षक असलेल्या पण स्वतः पायाने दिव्यांग असलेल्या मीरा गणग- कदम ४० लेकरांची माय बनल्या आहेत. त्यांच्या या सामाजिक कामात त्यांचे पती आधारवड बनलेत.

एका पायाने दिव्यांग असलेल्या मीरा धनराज गणगे कदम या हिंगोली शहरातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहेत. २०१४-१५ साली हिंगोलीत मोठा दुष्काळ पडला. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या निराधार मुलांना आधार देण्याचा वसा मीरा ताईंनी घेतला. त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना दत्तक घेतलं आणि त्यांच्या शिक्षणाचा खर्च केला.

या मुलांच्या खर्चासाठी त्यांनी स्वत:चा आणि पतीचा पगार यात खर्ची घातला. केवळ इथपर्यंतच न थांबता पुढे त्यांनी हॉटेलात, शेतात, दुकानात काम करणाऱ्या ४० मुलांनाही शिक्षणाच्या प्रवाहात आणलं. त्यांच्यासाठी एक घरही भाड्यानं घेतलं आणि त्या या अनाथांची माय बनल्या. यात त्यांना त्यांच्या पतीचीही साथ मिळाली आहे. 

गोर गरिबांची ही लेकरं आज कॉम्प्युटर सायन्सच शिक्षण घेतायत. त्यांच्या आवडी निवडी नुसार त्यांचं करिअर घडवलं जात आहे. भविष्यात हीच मुलं मोठं होऊन अनेकांना आधार देतील यात काही शंका नाही. पण या चाळीस मुलांचं संगोपन करता करता हे अनाथाचे माय बाप कर्जबाजारी बनलेत. त्यांच्या कार्याला उभारी देण्यासाठी, त्यांच्या कार्यात आर्थिक हातभार लावण्याची गरज आहे.