ब्रेकिंग न्यूज: संख्याबळ वाढल्याने आता भाजपा 'या' पदावर करणार दावा

आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेशी समझोता करण्याच्यादृष्टीने उपसभापतीपद शिवसेनेसाठी सोडण्याची तयारी भाजपाने दाखविली आहे.

Updated: Jul 9, 2018, 08:42 PM IST
ब्रेकिंग न्यूज: संख्याबळ वाढल्याने आता भाजपा 'या' पदावर करणार दावा title=

मुंबई: विधानपरिषदेच्या ११ जागांसाठीची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. त्यामुळे भाजपा आता विधानपरिषदेतील सर्वाधिक संख्याबळ असलेला पक्ष झाला आहे. याच संख्याबळाच्या जोरावर आता भाजपा विधानपरिषदेच्या सभापतीपदावर दावा करणार असल्याचे समजते. तर आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेशी समझोता करण्याच्यादृष्टीने उपसभापतीपद शिवसेनेसाठी सोडण्याची तयारी भाजपाने दाखविली आहे. त्यामुळे आता लवकरच विधानपरिषेच्या रचनेत मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 

भाजपचं विधानपरिषदेतलं संख्याबळ २१ झालं आहे. याआधी पहिल्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचं संख्याबळ १७ आमदारांपर्यंत घटले आहे. त्यामुळे आता विधानपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या आमदारांची संख्या समान झाली आहे. २०१४ सत्तेत आल्यानंतर म्हणजेच साडेतीन वर्षांनी भाजपा सभागृहातील सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. सोमवारी भाजपचे पृथ्वीराज देशमुख यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता ११ जागांसाठी केवळ ११ उमेदवारच मैदानात उरले. पृथ्वीराज देशमुख यांनी अर्ज दाखल केल्यामुळे ११ जागांसाठी उमेदवारांची संख्या १२ झाली होती. त्यामुळे निवडणूक होणार हे स्पष्ट होते. त्यातच पक्षांकडे असलेला मतांचा कोटा पाहता निवडणूक चुरशीची झाली असती. मात्र, देशमुख यांनी अर्ज मागे घेतला आणि ही चुरस टळली.

विधानपरिषदेतील पक्षीय बलाबल

भाजपा- २१
राष्ट्रवादी काँग्रेस -१७
काँग्रेस-१७
शिवसेना- १२
जदयू- १
आरपीआय कवाडे गट-१
शेकाप-१
रासप-१
अपक्ष-१
रिक्त-१