आणि आंबेगाव पुन्हा बाहेर आले!

कमी पावसामुळे पुणे जिल्ह्यात एक वेगळीच गोष्ट घडलीय. आंबेगाव डिंबा धरणाचे पाणी कमी होऊ लागल्याने या धरणाखाली गेलेलं आंबेगाव गावठाण पुन्हा दिसू लागलंय. त्यामुळे गावक-यांच्या आठवणींना उजाळा मिळतोय. 

Updated: Jul 5, 2014, 02:39 PM IST
आणि आंबेगाव पुन्हा बाहेर आले! title=
फाईल फोटो

पुणे : कमी पावसामुळे पुणे जिल्ह्यात एक वेगळीच गोष्ट घडलीय. आंबेगाव डिंबा धरणाचे पाणी कमी होऊ लागल्याने या धरणाखाली गेलेलं आंबेगाव गावठाण पुन्हा दिसू लागलंय. त्यामुळे गावक-यांच्या आठवणींना उजाळा मिळतोय. 

पुणे जिल्ह्यात घोडनदी आणि बुब्रा नदीच्या संगमावर वसलेल्या या पठारावर पूर्वी आंबेगाव हे वसलेले होते. 1967 ते 72 च्या सुमारास या भागात डिंबा धरण झाले आणि हे गाव पाण्याखाली गेले. यावर्षी अद्यापही पावसाची उघडीप असल्यानं धरणातला साठा कमी झालाय. त्यामुळे जुनं गावठाण दिसू लागलंय.

आंबेगाव तालुक्यातील डिंबा धरण बांधल्यानंतर १९८४ पाणी आडविण्यास सुरूवात झाली. त्यामध्येच आंबेगाव गावासह असंख्य नदी काठच्या गावांचा परीसर पाण्यात गेला.लोकांनी घरे, शेती सोडून इतर व पुर्नवसनाच्या ठिकाणी स्थंलातर करावे लागले. बेघर झालेल्या लोकांना गाव सोडून जावे लागले. परंतू जुन्या आंबेगावाचे प्रेम, अभिमान आणि मातीची ओढ आजही पुर्वीसारखीच कायम आहे.

आंबेगाव गावातील ग्रामस्थांची सर्वात मोठी आठवण म्हणजे गावातील त्यावळचे नदीकाठी असणारे जैन मंदिर . जुन्या गावातील वाडे, घरे, शाळेची इमारत, गावाची बाजारपेठ सर्वकाही धरणाच्या पाण्यात बुडून नाहीसे झाले. फक्त जुने जैन मंदिर ही वास्तू जुन्या आंबेगावचा इतिहास सांगण्याकरिता भक्कमपणे उभंय. राज्यात आजवर झालेल्या कमी पावसामुळे अनेकांच्या तोंडचं पाणी पळालाय. पण याच कमी पावसामुळे या भागातलं अख्खं गावठाण बाहेर आलंय. कमी पावसाचं हे एक वेगळं उदाहरण मानायला हवं...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.