Leaders : जीवघेण्या कॅन्सरला हरवून पुन्हा मैदानात परतलाय युवराज सिंग

या महान अष्टपैलू खेळाडूने कॅन्सरशी लढाई जिंकली आहे.

Updated: Nov 4, 2021, 02:21 PM IST
Leaders : जीवघेण्या कॅन्सरला हरवून पुन्हा मैदानात परतलाय युवराज सिंग title=

मुंबई : भारतीय क्रिकेटचा युवराज सिंग असा खेळाडू आहे ज्याची कहाणी तुम्हाला केवळ मैदानावरच नाही तर मैदानाबाहेरील वैयक्तिक आयुष्यातही प्रेरणा देईल. अप्रतिम शॉट्स, उत्तम गोलंदाजी आणि मैदानावर अतुलनीय फिल्डींगने प्रतिस्पर्ध्यांना मात देणारा हा खेळाडू वैयक्तिक आयुष्यातही हिरो आहे. वर्ल्ड चॅम्पियन, सिक्सर किंग अशा उपमाही त्याला कमी पडतील. कारण या महान अष्टपैलू खेळाडूने कॅन्सरशी लढाई जिंकली आहे. ही गोष्ट आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. मात्र त्याच्या कॅन्सरच्या लढाईबाबत फार क्वचित लोकांना कल्पना आहे.

युवराज सिंग देशासाठी वर्ल्डकप खेळत होता आणि एकामागून एक उत्तम अशा कामगिरी करत होता. त्याला पाहून तो कॅन्सरशी झुंज देत असल्याची कल्पनाही कोणी करू शकत नाही. वर्ल्डकप-2011 मध्ये जेव्हा भारत श्रीलंकेला हरवून विश्वविजेता बनला होता, तेव्हा काही दिवसांतच युवराजच्या तब्येतीशी संबंधित बातम्या समोर आल्या. ज्याने त्याचे चाहते आणि भारतीय संघ हादरला. युवराज सिंगच्या फुफ्फुसात कॅन्सरची गाठ आढळून आली होती.

देश आणि जगातील क्रिकेट चाहते त्याच्यासाठी प्रार्थना करत होते. कॅन्सरशी संघर्ष होता, त्यामुळे युवीला क्रिकेटपासून बरेच दिवस दूर राहावं लागलं. या ट्यूमरच्या दुखण्याने युवराज वर्ल्ड कपमध्ये खेळला आणि तेव्हा त्याने हे कोणालाच सांगितले नाही. त्यानंतर भारतासाठी प्रत्येक सामन्यात तो सातत्याने स्वत:ला सिद्ध करत होता. त्याने क्रिकेटमधून ब्रेक घेतला आणि नंतर या जीवघेण्या आजारावर मात करून पुनरागमन केलं.

युवी वर्ल्डकप खेळत असताना त्याला कर्करोग झाला होता. तो वेदनेशी झुंजत होता पण देशाला विश्वविजेता बनवण्याचा निर्धार होता. त्याच्या सहकाऱ्यांनीही नंतर सांगितलं होतं की, तो स्पर्धेदरम्यान संघर्ष करत होता, पण पराभव झाला नाही. टीम इंडियाच्या विश्वचषक 2011 च्या विजयात तो सर्वात मोठा हिरो ठरला. त्या विश्वचषकात त्याच्या शानदार खेळासाठी त्याला मॅन ऑफ द टूर्नांमेंट म्हणून गौरवण्यात आलं होतं. या वर्ल्डकपमध्ये त्याने 362 धावा आणि 15 विकेट घेतल्या होत्या.

युवराजने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, "उपचारानंतरही तो अडचणींचा सामना करत होता. या दरम्यान मी सचिन तेंडुलकर याच्याशी तो बोलायचा. आणि सचिननेच त्याला क्रिकेटमध्ये परतण्याची प्रेरणा दिली."