'मुंबई पालिका ही राज्य सरकारची पाळीव' कंगना पुन्हा बरळली

कंगनाने पुन्हा  महाराष्ट्र सरकारवर आणि पालिकेवर निशाणा साधलाय.

Updated: Sep 20, 2020, 02:55 PM IST
'मुंबई पालिका ही राज्य सरकारची पाळीव' कंगना पुन्हा बरळली title=

मुंबई : बॉलिवुडमधील वादग्रस्त अभिनेत्री वारंवार ट्वीट करुन चर्चेत येत आहे. आता कंगनाने पुन्हा  महाराष्ट्र सरकारवर आणि पालिकेवर निशाणा साधलाय. तिने एक मेसेज लिहित मुंबई महानगर पालिकेला तिने राज्य सरकाची पाळलेली असा उल्लेख केलाय. इमारतीचे नुकसान केल्याप्रकरणी मुंबई नगर निगम अधिनियम १८८८ च्या कलम ३५१ चे उल्लंघन केल्याचे तिने म्हटलंय. 

महाराष्ट्र सरकार आणि त्यांनी पाळलेल्या बीएमसीसाठी एक खास संदेश असे म्हणत तिने निशाणा साधलाय. पालिकेच्या या कारवाईवर कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात नुकसान भरपाईची याचिका दाखल केली आहे. कंगनाने सुधारित याचिका दाखल करत महापालिकेकडे दोन कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. 

अल्पावधीची नोटीस देत कारवाई करणं पक्षपाती आणि चुकीचं असल्याचा आरोप कंगनानं केला होता. त्यानंतर आता राज्यसरकारवर केलेल्या टीकेमुळे कार्यालयावर बेकायदेशीर कारवाई केल्याचा आरोप तिने सुधारित याचिकेत केला आहे. कंगनाच्या ज्या ऑफिसवर महापालिकेने कारवाई केली, ते तब्बल 48 कोटींचं असल्याची माहिती आहे. 

कंगना राणौतने मुंबईची तुलना पाकिस्तान-पीओकेशी केल्यानंतर विविध माध्यमातून तिच्यावर टीका होत आहे. कंगना राणौतच्या मुंबईमध्ये येण्याला शिवसैनिकांनी विरोध केला. तर दुसरीकडे आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी मात्र कंगनाला पाठिंबा दिला आहे. तसंच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही कंगनाच्या कार्यालयावर ज्याप्रकारे कारवाई करण्यात आली होती, त्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. 
कंगनाने रविवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. जवळपास 45 मिनिटं कंगना आणि राज्यपाल यांची चर्चा झाली. बीएमसीने कार्यालयावर केलेल्या कारवाईबाबत, कंगनाने राज्यपालांशी चर्चा केली. कंगना आणि राज्यपाल यांच्या बैठकीवेळी, कंगनाची बहीण रंगोलीही उपस्थित होती. मला न्याय मिळायला हवा. राज्यपालांनी माझं म्हणणं मुलीप्रमाणे ऐकून घेतलं. मुंबईने आतापर्यंत मला खूप काही दिलं आहे. आता न्यायही द्यावा, अशी मागणीही तिने केली आहे. 

मुंबई आणि मुंबई पोलिसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कंगना रानौत हिच्यावर अनेकांनी तोफ डागली. शिवसेना आणि सत्ताधारी महाविकास आघाडीकडून कंगनाचा कडाडून विरोध करण्यात आला. त्यानंतर कंगनाने थेट आव्हान देत जे उखडायचे आहे ते उखडा, मी माझे मांडणार अशी भूमिका घेतली होती. तसेच शिवसेना आणि राज्य सरकारविरोधात हल्लाबोल सुरुच ठेवला होता. दरम्यान, पालिकेने कंगनाच्या मालमत्तेत निहमबाह्य बदल करण्यात आल्याप्रकरणी नोटीस बजावली होती. तिला २४ तासांत उत्तर देण्यासाठी वेळ दिला होता. मात्र, तिने मुंबई पालिकेच्या नोटीशीला उत्तर दिले नाही. त्यानंतर पालिकेने मालमत्तेत १४ निहमबाह्य बदल करण्यात आल्याप्रकरणी कारवाईचा बडगा उगरला होता. नियबाह्य बांधकाम जमीनदोस्त केले. त्यानंतर कंगनाने आकंडतांडव केले होते.

९ सप्टेंबर २०२० रोजी बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप करत महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली. त्याच दिवशी कंगनाने उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्यानंतर न्यायालयाने बीएमसीच्या कारवाईला स्थगिती दिली. त्यानंतर १५ सप्टेंबर रोजी कंगना रानौत हिने आपल्या सुधारित याचिकेत बीएमसीने केलेल्या कारवाईसाठी नुकसान भरपाई म्हणून दोन कोटींची मागणी केली.