सरकार, अहो काय चाललंय हे.... मराठी सिनेसृष्टीने मांडली आपली व्यथा

सरकारला विचारला जाब.... नेमकं आमचं काय चुकलं?

Updated: Apr 20, 2021, 10:47 AM IST
सरकार, अहो काय चाललंय हे.... मराठी सिनेसृष्टीने मांडली आपली व्यथा  title=

मुंबई : संपूर्ण राज्यात संचारबंदीचे आदेश देण्यात आले. येत्या काही तासात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात येईल. कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. पण याबरोबरच आता सामान्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे. सिनेसृष्टीतील सगळी कामे तात्काळ बंद करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले. यामुळे सिनेकलाकार आणि इतर सहकारी कर्मचाऱ्यांवर आता उपासमारीची वेळ येईल असं म्हटलं आहे. 

ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये मराठी मनोरंजन क्षेत्राची व्यथा मांडली आहे. या पोस्टमध्ये सेव्ह मराठी फिल्म इंडस्ट्री आणि सेव्ह महाराष्ट्र फिल्म इंडस्ट्री असे हॅशटॅग वापरण्यात आले आहेत. 

काय आहे ही पोस्ट?

#savemahafilmindustry
#savemarathifilmindustry

सरकार,
अहो काय चाललंय हे ...
आ....

मराठी भाषेवर आणि मराठी माणसावर प्रेम आहे तुमचं म्हणून तर तुम्ही सरकार आहात आमचं...

पण तुमच्या या निर्णयाने महाराष्ट्राची, मुंबईची शान असलेल्या फिल्म इंडस्ट्रीला खरोखरच देशोधडीला लावाल ओ....

कोरोनातून वाचू पण उपाशी मरायची वेळ आणाल..
आधीच फिल्म इंडस्ट्री ला डिप्रेशन चा शाप ...

आधीच सगळ्यांचं कंबरडं मोडलेल आहे.. 
थिएटर बंद.. न्यू रिलिज बंद..
नाटकावर बंदी...
इतर सर्व शोज बंद...
उरल सुरल टेलिव्हिजन आणि Advertising क्षेत्र सुद्धा या निर्णयाने बंद करायला लावलं तुम्ही ????
हे कुठून सुचलं तुम्हाला सरकार ??
मराठी फिल्म इंडस्ट्रीतील दिग्गज माणसं तुमच्या शेजारी असताना असा चुकीचा सल्ला कसा मान्य केला आपण ???

तुमच्या या निर्णयाने आधीच दुसऱ्या राज्यात फिल्म इंडस्ट्री  करिता रेड कार्पेट घालणाऱ्यांच चांगलच फावले.. जोरदार ऑफर येतायत सगळीकडून.. आणि त्यात त्यांच चुकत नाहीये ओ.. चुकतंय आपलं... आपण कंपलसरी शूटिंग बंद करून चॅनल आणि प्रोडूसर समोर पर्याय नाही ठेवलाय...

आता दुसऱ्या राज्यात जाण्या इतपत बजेट हिंदी वाल्यांच आहे.. म्हणून ते गेले सगळे... महाराष्ट्रातला व्यवसाय, रोजगार, महसूल यावर काहीच विचार नाही केला ? 
पण मराठी माणसाचं काय...? आज चॅनल देईल उचलून थोडेफार जास्तीचे पैसे... पण त्यांनाही त्यांचा व्यवसाय सांभाळायचाय... नंतर ते ही हे पैसे वसूल करणारच.. त्यात मरेल मराठी प्रोडूसर.. आणि पर्यायाने मराठी कलाकार, तंद्रज्ञ.. कारण या वसुलीसाठी परत बजेट कमी केली जाणार, सगळ्यांची पेमेंट कमी केली जाणार ही भीती आहेच की ओ... पण मराठी चॅनल जगली तर मराठी फिल्म इंडस्ट्री जगणार आहे...

त्यात हिंदी चॅनल चालू राहिली आणि मराठी बंद राहिली 
तर ???? आत्तापर्यंत मराठी चॅनल नी हिंदी वर मात करून जो टीआरपी कमावलाय तो जाणार परत हिंदी चॅनल कडे.. 20/25 दिवस, महिनाभर मराठी माणसाला मराठी सोडून हिंदी चॅनेल वरच्या हिंदी सीरियल बघायला लावायच्या... मग प्रेक्षक अडकतो त्याच्यातच... त्या मायबाप प्रेक्षकाला पुन्हा मराठी चॅनल कडे वळवण्यासाठी पुढचे 6/9 महिने घालवायचे आमच्या हक्काच्या मराठी चॅनल नी ? एवढं सोप्पं आहे का ते ??? 
15/20 दिवसाचा प्रश्न नाहीये हा... दूरगामी परिणाम वाईट आहेत...

बरं....
IPL चालू..
MIDC चालू...
पंढरपूर चालू...
इ कॉमर्स चालू...
अगदी खाद्य पदार्थांच्या हातगड्याही चालू...
सगळ्या गावभर बिनकामाची माणसं फिरतात...
आणि आम्ही... सर्व नियम पाळून.. कमीत कमी कलाकार तंद्रज्ञांनाना घेऊन.. एकाच ठिकाणी राहून शूटिंग करतोय.. दर आठवड्याला covid टेस्ट करतोय... सगळ्यांचे इन्शुरन्स उतरवतोय ... वारंवार सॅनिटाईझ करतोय... तरीही फिल्म इंडस्ट्री बंद ??
छोट्या उद्योगांना राहण्याची सोय असेल तर परवानगी देऊ म्हणाला होतात असं ऐकल्यासारख वाटतंय....
अहो जशी तुम्हाला काळजी आहे तशीच किंबहुना त्याहून जास्त काळजी चॅनल, प्रोडूसर, कलाकार घेतात सेट वर.. कारण एखादा कलाकार किंवा तंद्रज्ञ आजारी पडला तर त्याचा परिणाम आमच्याच प्रोजेक्ट वर होणार ना ???

बाकीच्या राज्यात इलेक्शन साठी कलाकारांना तिकीट देतायत, प्रचाराला, रॅली ला बोलतायत... आणि इथे ??? फिल्म इंडस्ट्री बंद करतायत???

एवढी फिल्म इंडस्ट्री महत्वाची वाटत असेल तर ताबडतोब 2 दिवसात निर्णय घेऊन मराठी चॅनल, प्रोडूसर, कलाकारांची फरफट थांबवा सरकार...
आणि एवढी महत्वाची वाटत नाही तर "शूटिंग बंद" "फिल्म इंडस्ट्री बंद" हे तरी GR मध्ये का आणल ??? हे GR मध्येच आणलं नसतं तर काय फरक पडत होता ?

"एक कलाकारही कलाकार को समझ सकता है" हे खरं करण्याची वेळ आलीय...

सरकार...
मायबाप...
आमच्यावर काय राग आहे का ???
काय चुकलं असेल तर सांगा ओ हक्कानी...
पण अस पोटावर मारू नका....

#savemahafilmindustry 
#savemarathifilmindustry

ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामधून कलाकारांनी आपली व्यथा मांडली आहे. मुख्यमंत्री होण्याअगोदर उद्धव ठाकरे हे एक कलाकार आहेत आणि एक कलाकारंच कलाकाराची गरज समजू शकतो. असं यामध्ये मांडण्यात आलं आहे.