नात्याचं महत्त्व सांगणारी ‘दाह एक मर्मस्पर्शी कथा’

फक्त अपेक्षा असते प्रेमाची. 

Updated: Dec 26, 2019, 11:00 PM IST
नात्याचं महत्त्व सांगणारी ‘दाह एक मर्मस्पर्शी कथा’ title=

मुंबई : 'काहे दिया परदेस' या मराठी मालिकेच्या माध्यमातून घरा-घरात पोहोचलेली अभिनेत्री सायली संजीव लवकर ‘दाह एक मर्मस्पर्शी कथा’या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. आपल्या आणि परक्या नात्यांचं आयुष्यात असणारं महत्त्व या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांना अनुभवता येणार आहे. आपल्या नात्यामध्ये कधीही भेद नसतो. फक्त अपेक्षा असते प्रेमाची. 

प्रत्येकाच्या आयुष्यात नात्याला एक विशेष स्थान असतं. नात्यांच्या सहवासामुळे अनेक दु:खं सहन करण्याची ताकद मिळते तर सुखी क्षणांचा आनंद साजरा करायला सोबत मिळते. नाती नाती आपली किंवा परकी असा भेदभाव नसला तरी मायेची, प्रेमाची भावना त्यामध्ये असते.

डॉ. सतिश सोनोने लिखीत चित्रपटाचे दिग्दर्शन मल्हार गणेश यांचे आहे. या चित्रपटात मराठी मालिका आणि चित्रपटातील सुप्रसिध्द अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेते गिरीश ओक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यांच्यासह राधिका विद्यासागर, सुहृद वार्डेकर, यतिन कार्येकर, उमा सरदेशमुख, किशोर चौघुले यांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत.

‘दाह’ चित्रपटाची कथा ही कौटुंबिक आहे. चित्रपटाच्या कथेसह यामधील गाणी देखील थेट प्रेक्षकांच्या काळजाला भिडतील अशी तयार करण्यात आली आहेत. संगीतकार प्रफुल्ल स्वप्निल यांनी गाण्यांना संगीत दिले आहे. 

गीतकार मंदार चोळकर आणि तेजस रानडे यांनी गाण्यांचे बोल लिहिले आहेत. संगीतकार आणि गीतकार यांनी तयार केलेल्या गाण्यांना स्वप्नील बांदोडकर, मनिष राजगिरे, अनिरुध्द वानकर, बेला शेंडे आणि मधुश्री यांनी आवाज दिला आहे.