लेकिचा संसार वाचवण्यासाठी रजनीकांत मदतीला, याआधीही केली मध्यस्थी

रजनीकांत यांनी घेतलीये मोठी जबाबदारी 

Updated: Jan 27, 2022, 01:27 PM IST
लेकिचा संसार वाचवण्यासाठी रजनीकांत मदतीला, याआधीही केली मध्यस्थी title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता धनुष (Dhanush) आणि त्याची पत्नी ऐश्वर्या रजनीकांत (Aishwaryaa Rajinikanth) यांच्या वैवाहिक नात्यात मोठी ठिणगी पडली. अचानकच या जोडीनं आपण विभक्त होत असल्याचा निर्णय जाहीर केला. चाहते आणि दोघांच्याही कुटुंबीयांसाठी हा मोठा धक्का होता. अनेकांनीच त्यांच्या वेगळं होण्यासाठीचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण, अद्यापही ती माहिती समोर आलेली नाही. 

काही दिवसांपूर्वीच धनुषच्या वडिलांच्या वक्तव्यानुसार कौटुंबीक वादामुळं त्यांच्यात खटका उडाला, पण हा तात्पुरता दुरावा आहे, असं ते म्हणाले. 

आता म्हणे ऐश्वर्याचे वडील, सुपरस्टार रजनीकांत यांनी लेकिचा संसार वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली. 

कोणतेही वडील आपल्या मुलाबाळांच्या संसारावर आलेलं संकट सहजाहजी पाहू शकत नाहीत. याच भावनेनं आता रजनीकांत सक्रिय झाल्याचं कळत आहे. 

असंही म्हटलं जात आहे की ऐश्वर्या आणि धनुष यांच्या नात्यात अनेकदा टोकाचे निर्णय घेण्यापर्यंतचे वाद झाले. प्रत्येक वेळी रजनीकांत यांनी त्यांच्यामध्ये मध्यस्थी केली होती. 

आताही ते पुन्हा अशीच मदत या दोन्ही लेकरांना करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार रजनीकांत यांच्यावर मुलीचा संसार तुटण्याचे वाईट परिणाम झाले आहेत. 

हा दुरावा, विभक्त होण्याचा निर्णय तात्पुरता असण्यावरच ते भर देत आहेत. मुलीच्या संसारात असणारे मतभेद दूर करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. 

फक्त ऐश्वर्याच नाही, तर धनुषचे वडील आणि कुटुंबही या नात्याची विस्कटलेली घडी पूर्ववत करण्याच्या प्रयत्नांत आहे. 

असं कळत आहे की यावेळी झालेला वाद हा अतिशय मोठा होता. ज्यामुळं अखेर धनुष आणि ऐश्वर्यानं विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पण, आता रजनीकांत नेहमीप्रमाणं त्यांच्या लेकिचा संसार आधीसारखा करण्यात यशस्वी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.