'हिंदी ही मुंबईत बोलली जाणारी भाषा', 'तारक मेहता' मालिका वादात

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका मराठीचा अपमान केल्याने वादात 

Updated: Mar 3, 2020, 06:23 PM IST
'हिंदी ही मुंबईत बोलली जाणारी भाषा', 'तारक मेहता' मालिका वादात  title=

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका मराठीचा अपमान केल्याने वादात सापडली आहे. यामुळे मालिेकेवर चहुबाजूने टीका होत आहे. हिंदी ही मुंबईतील सर्वसाधारण भाषा आहे म्हणून आपण हिंदीत सुविचार लिहितो असा संवाद नुकत्याच झालेल्या भागात दाखवण्यात आलाय. यावर मनसे आक्रमक भूमिका मांडताना दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करुन यावर आगपाखड केली आहे. शालिनी ठाकरे यांनी देखील खरमरीत भाषेत मालिकेच्या टीमला धारेवर धरले आहे. 

मुंबईची 'आम भाषा' हिंदी नाही, मराठी आहे, हे ह्या सब टीव्हीवाल्यांना मान्य नसेल, तर महाराष्ट्र सैनिकांना त्यांच्या कानाखाली 'सुविचार' लिहावे लागतील! तेसुद्धा मराठीत! 'कानाखाली काढलेले मराठी सुविचार' ह्यांना बरोबर वाचता येतील!! असे ट्वीट शालिनी ठाकरे यांनी केले आहे. 

'हमारा गोकुलधाम मुंबई में हैं, और मुंबईकी आम भाषा क्या है? हिंदी... इसलिए हम सुविचार हिंदी में लिखते है, अगप हमारा गोकुलधाम चेन्नई में होता तो तामिळ मे लिखते,' असा संवाद जेठालालचे वडील म्हणजे बापुजी सोसायटी वाल्यांशी करत आहेत. यावर सोसायटीतील मंडळी मान डोलावून त्याला होकार देताना दिसत आहेत. या मालिकेत अनेक मराठी कलाकार देखील आहेत. त्यांना यावर आक्षेप का घेता आला नाही ? असा प्रश्न मनसेने उपस्थित केला आहे.

'मुंबईची भाषा मराठी आहे हे यांना व्यवस्थित माहित आहे. तरी देखील मालिकांमधून अशा प्रकारचा अपप्रचार केला जातोय.

या गुजराती किड्यांची वळवळ थांबवावीच लागेल. तसेच मालिकेत काम करणाऱ्या मराठी कलाकारांना देखील यात चुकीचं वाटत नाही याबद्दल शरम वाटते, अशा शब्दात खोपकर यांनी आपली खंत व्यक्त केली आहे.