Conjunctivitis : राज्यात डोळ्यांच्या साथीचं थैमान! तब्बल अडीच लाखाहून जास्त रुग्णांची नोंद

Conjunctivitis : महाराष्ट्रात डोळे येण्याच्या साथीने थैमान घातलंय. महाराष्ट्रात डोळे आलेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 88 हजार 703 एवढी आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये डोळ्यांची साथ जोरदार आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Aug 8, 2023, 08:18 PM IST
Conjunctivitis : राज्यात डोळ्यांच्या साथीचं थैमान! तब्बल अडीच लाखाहून जास्त रुग्णांची नोंद title=

Conjunctivitis : सध्या पावसाळा सुरू असून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जलजन्य, किटकजन्य साथरोग बळावतात. राज्यात अशा जलजन्य, किटकजन्य साथरोगांचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत काही भागात साथरोगांचा उद्रेक होण्याची भीतीही असते. त्यामुळे विभागाने सतर्क राहून साथरोग नियंत्रणासाठी विविध उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी साथरोग नियंत्रण बैठकीत दिले.

या बैठकीमध्ये राज्यातील मलेरीया, डेंग्यू, चिकनगुण्या इत्यादी आजारांचा जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. जास्त रूग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये रूग्ण वाढीची कारणं आणि उपाययोजना यांच्यावर चर्चा देखील करण्यात आली. यावेळी डोळे येण्याच्या साथीच्या रूग्णांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलंय. 

महाराष्ट्रात डोळे येण्याच्या साथीने थैमान घातलंय. महाराष्ट्रात डोळे आलेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 88 हजार 703 एवढी आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये डोळ्यांची साथ जास्त प्रमाणात पसरली असल्याचं दिसून येतंय. या साथीचा मुकाबला करण्यासाठी पुरेशा उपाययोजना असल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिलीय.

राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले, साथरोगांच्या प्रभावी नियंत्रणासाठी राज्यस्तरीय वॉर रूमसह ज्या भागात एखाद्या साथरोगाचा उद्रेक झाला. साथरोगावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी एक वॉर रूम तयार करावी. ही वॉर रूम राज्यस्तरीय वॉर रूम सोबत संलग्न असावी. वॉर रूमला साथरोग रूग्णांबाबत, फैलावाबाबत 24 तासात माहिती द्यावी. जेणेकरून उपाययोजना करणे सोयीचे होईल. त्याचप्रमाणे घरोघरी सर्वेक्षण करून डासांची उत्पत्ती स्थाने शोधावी. त्यांना नष्ट करून किटकजन्य साथरोग आटोक्यात आणावा. सर्वेक्षणादरम्यान कुटूंबाला प्रतिबंधात्मक उपायांबाबत जागरूकही करावे.

साथरोग नियंत्रणासाठी आवश्यक औषधांचा पुरवठा नियमितरित्या करण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांकडून कऱण्यात आल्या आहेत. डॉ. सावंत पुढे म्हणाले, औषधांचा पुरवठा कुठेही बाधीत होता कामा नये. आवश्यक औषधांचा साठा तपासून घ्यावा. त्यानुसार नियोजन करावे. तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या पथकांमार्फत शालेय मुलांची तपासणी करावी.  

मुंबई महानगर पालिका क्षेत्रात मलेरीया रूग्णसंख्या असलेल्या प्रभागांमध्ये उपाययोजना कराव्यात. धूर फवारणी नियमित करावी. बांधकामांमुळे पाणी साचून किटकजन्य आजारांमधील वाढ लक्षात घेता, मुंबईत पालिकेच्या आरोग्य विभागाने बांधकाम परवानगी देणाऱ्या विभागाची मदत घेवून पाणी न साचण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असंही मंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.