कोरोनाच्या भीतीने औषधं खाताय? ही ठरु शकते सर्वात मोठी चूक

पाहा काय करावं आणि काय करु नये

Updated: Mar 11, 2020, 09:22 PM IST
कोरोनाच्या भीतीने औषधं खाताय? ही ठरु शकते सर्वात मोठी चूक  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : Corona व्हायरसचं थैमान जगभरात दिवसागणिक वाढतच आहे. चीन, इटली, इराण यामागोमाग आता भारतातही कोरोनाचा शिराकाव झाला आहे. ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे पाहायला मिळणारं हेच चिंताजनक वातावरण पाहता नागरिकांमध्ये असणारे काही गैरसमजही दूर केले जाण्याची गरज आहे. 

मुळात बॅक्टेरिया म्हणजेच जीवाणू आणि व्हायरस म्हणजेच विषाणू या दोन भिन्न गोष्टी असल्याची बाब लक्षात घेतली जाणं अतिशय महत्त्वाचं आहे. चांगले बॅक्टेरिया हे अन्नपचनास मदतीचे ठरतात. तर, वाईट बॅक्टेरिया निमोनिया आणि टीबीसारखे आजार देतात. याच तुलनेत व्हायरस हे बहुतांश वेळांना वाईट परिणामच करतात. बॅक्टेरियल आजारांसाठी अनेक एँटीबायोटीक औषधं उपयोगाची ठरतात. किंबहुना बॅक्टेरियाच्याच अनुषंगाने ही औषधं तयार केली जातात. 

व्हायरसची पडताळणी होणं हीच मुळात कठीण बाब असते. सतत बदलणारी संरचना आणि शरीराच्या डीएनएशी होणारी छेडछाड यांमुळे व्हायरसचं स्वरुप हे सतत बदलत असतं. व्हायरसवरही औषधांच्या मदतीने उपचार करण्यात येते. पण, त्याचं प्रमाण हे कमी असतं. त्यामुळे जेव्हा केव्हा साथीचे आजार, ताप येतो तेव्हा अनेकदा आराम करण्याचा सल्ला दिला जातो. स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू हे असेच काही आजार. या व्हायरल आजारांचं निदान होताच त्यावर एँटीबायोटीक औषधं खाण्याची काहीच गरज नाही. किंबहुना त्याचा थेट फायदाही नाही. उलटक्षी यामुळे तुमचं नुकसानही होऊ शकतं. 

वाचा : दुर्मिळ पांढऱ्या जिराफाच्या मादीची पिलासह शिकार 

कोरोना व्हायरसच्या धर्तीवरही हाच इशारा देण्यात येत आहे. दैनंदिन जीवनामध्ये कोरोनाची लक्षणं आढळल्यास खबरदारी म्हणून लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शिवाय प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्वच्छतेचे निकष पाळणंही फायद्याचं ठरणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या भीतीने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही औषधाचं सेवन न करता तब्येतीला जपा असंच आवाहन सध्या करण्यात येत आहे.