'रघुकूल हॉलिडेज'नं केली फसवणूक, महाराष्ट्रातले पर्यटक अडकले

या पर्यटकांनी आपल्या ओळखीतून ४० लाख रुपये जमा केले

Updated: Jun 25, 2018, 11:11 PM IST

नवी दिल्ली : कैलास मानसरोवर यात्रेला गेलेले महाराष्ट्रातले ५८ पर्यटक नेपाळमध्ये चीनच्या सीमेवर अडकून पडले आहेत. यामध्ये ५० पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक आहेत. पुण्यातल्या रघुकुल हॉलिडेज या कंपनीच्या माध्यमातून ८७ लाख रुपये भरून पर्यटक यात्रेला निघाले होते. काठमांडूमधील एक पर्यटन कंपनी त्यांना सीमेपलिकडे पोहोचवण्याचं काम करणार होती. मात्र रघुकूल हॉलिडेजनं ५४ लाख रुपये जमाच केले नसल्यामुळे नेपाळच्या कंपनीनं या पर्यटकांना पुढे नेण्यास नकार दिलाय. 

अखेर या पर्यटकांनी आपल्या ओळखीतून ४० लाख रुपये जमा केले असून आता हे पर्यटक लवकरच यात्रेवर रवाना होतील. 

दरम्यान, नेपाळच्या भारतीय दूतावासानं पर्यटकांचे ४० लाख १० जुलैच्या आत परत करण्याचं लेखी आश्वासन रघुकूल हॉलिडेजकडून घेतलं आहे. मात्र या गोंधळामुळे गेल्या दोन दिवसांपासून पर्यटकांना अडकून पडावं लागलंय.