'२०२०च्या अखेरपर्यंत ६७ कोटी भारतीयांना कोरोनाची लागण होईल'

लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपल्यानंतर देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढेल.

Updated: May 30, 2020, 09:10 AM IST
'२०२०च्या अखेरपर्यंत ६७ कोटी भारतीयांना कोरोनाची लागण होईल' title=

नवी दिल्ली: यंदाच्या वर्षाच्या अखेरपर्यंत देशातील ६७ कोटी लोकांना कोरोना व्हायरसची Coronavirus लागण होईल, असा अंदाज राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि मेंदूशास्त्र संस्थेने Nimhans वर्तविला आहे. Nimhans मधील डॉक्टरांच्या मतानुसार, लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपल्यानंतर देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढेल. यानंतर भारतात कोरोनाच्या सामूहिक संसर्गाला community transmission सुरुवात होईल, अशी भीती डॉक्टरांनी वर्तविली आहे. 

मात्र, यापैकी ९० टक्के लोकांना आपल्याला  कोरोनाची लागण झाली आहे, हे समजणारही नाही. कारण या लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून येणार नाहीत. केवळ पाच टक्के रुग्णांची अवस्था गंभीर असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागेल. मात्र, ६७ कोटीपैकी ५ टक्क्याचा हिशेब करायचा झाला तरी देशातील ३० लाख लोकांची प्रकृती गंभीर असेल. त्यामुळे आगामी काळात देशातील आरोग्य यंत्रणेला जय्यत तयारी करावी लागणार आहे. 

कोरोना: १५ दिवसानंतर या राज्यांमध्ये दुप्पटीने वाढणार रुग्ण

तसेच आगामी काळात ग्रामीण भागातही कोरोनाचा वेगाने फैलाव होण्याची शक्यता आहे. १६ मे पर्यंतची आकडेवारी पाहिल्यास देशातील एकूण कोरोनबाधितांपैकी २१ टक्के रुग्ण हे ग्रामीण भागातील होते. त्यामुळे कोरोना याच वेगाने वाढत राहिल्यास येत्या काही महिन्यांत ग्रामीण भागातील ७० लाख लोकांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता आहे. 

विक्रमी उच्चांक; एकाच दिवशी कोरोनाचे ८ हजार ३८१ रुग्ण ठणठणीत बरे

तर देशातील काही तज्ज्ञांच्या मते भारतात जुलै महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला (Peak Point) पोहोचेल. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने याच्या अगदी उलट अंदाज वर्तवला आहे. तर स्टँटर्ड अँण्ड पुअर्स या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्यापर्यंत भारतात कोरोनाचा Peak Point येणार नाही. मात्र, यानंतर परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर पाच टक्क्यांनी घसरेल, असे स्टँटर्ड अँण्ड पुअर्सने सांगितले आहे.