दोनहून अधिक मुलांचे पालक सरकारच्या सुविधांपासून वंचित

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली चिंता 

Updated: Oct 23, 2019, 10:07 AM IST
दोनहून अधिक मुलांचे पालक सरकारच्या सुविधांपासून वंचित title=

मुंबई : दोनपेक्षा अधिक मुलं असणाऱ्या पालकांना भाजपाची सत्ता असणाऱ्या काही राज्यांमध्ये सरकारी योजनांचा लाभ घेता येणार नाही. दोनहून अधिक मुलांचे पालक सरकारी योजनांपासून वंचित राहणार आहेत. दोनहून अधिक मुलं असणाऱ्या पालकांशी सरकार सख्तीने वागणार आहे. 1 जानेवारी 2021 पासून सरकार हा निर्णय लागू करणार आहे. 

या निर्णयात दोनहून अधिक मुलांच्या पालकांना सरकारी नोकरी मिळणार नाही. हा नियम आसाममध्ये लागू केला जाणार आहे. भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने याची माहिती दिली आहे. भविष्यात हा निर्णय इतर भाजपा सत्ताधारी राज्यात देखील लागू केला जाणार आहे. 

सुरूवातीला दोनहून अधिक मुलांच्या पालकांना सरकारी नोकरीपासून वंचित ठेवले जाणार त्यानंतर सरकारच्या इतर सुविधापासूनही या पालकांना दूर ठेवले जाणार. भाजप सत्ताधारी राज्यात लोकसंख्या नियंत्रणात आणण्याकरता केंद्रांच्या स्तरावर हा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी काळात सर्वाधिक राज्यात भाजप सरकार असेल असा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्यावर वाढत्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे अशी आशा व्यक्त केली जात आहे की, आगामी काळात हा नियम लागू होऊ शकतो. या निर्णयावर सरकार आणि पक्षात चर्चा सुरू आहे.  या निर्णयाचं स्वागत करत आसाम सरकारने हा नियम लागू केला आहे. त्यामुळे आता पालकांनी दोनपेक्षा अधिक मुलांचा विचार करताना या निर्णयाकडे लक्ष द्यावे.