अयोध्या प्रकरण निकाल : समाजमाध्यमांवर कडक नजर, काही ठिकाणी इंटरनेटसेवा बंद

अयोध्या प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल आज सर्वोच्च न्यायालय देणार आहे.  

Updated: Nov 9, 2019, 08:26 AM IST
अयोध्या प्रकरण निकाल : समाजमाध्यमांवर कडक नजर, काही ठिकाणी इंटरनेटसेवा बंद title=
संग्रहित छाया

नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल आज सर्वोच्च न्यायालय देणार आहे. हा निकाल आज सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास येण्याची शक्यता आहे. शनिवारी न्यायालयाला सुट्टी असतानादेखील हा निकाल देण्यात येणार आहे. सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून अयोध्येत ४ हजार जवान तैनात करण्यात येणार आहेत. तसेच उत्तर प्रदेशमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी समाजमाध्यमांवर कडक नजर ठेवली आहे. तर काही ठिकाणी इंटरनेटसेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या बैठकीनंतर पोलिसांच्या सायबर सेलनेही फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यामध्ये निकालापूर्वी तसंच निकालानंतर फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केली जाणारी प्रक्षोभक भाषणे, माहिती आणि व्हिडिओंवर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये सर्व शाळा आणि महाविद्यालयांना ९ ते ११ तारखेपर्यंत सुटी जाहीर करण्यात आली आहे. शहरात ड्रोन कॅमेराने नजर ठेवण्यात येणार आहे, तसेच सोशल मीडियासंदर्भात अॅडवायजरी लागू करण्यात आली आहे.  

या निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी काल महत्त्वाची बैठक घेतली. उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक यांना सरन्यायाधीशांनी बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. महाराष्ट्रातही पोलीस महासंचालकांनी उच्चस्तरीय पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीत आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा केली गेली. १९९३ मधल्या दंगलीत सहभाग असलेल्या सर्वांची एफआयआर नोंदी तपासल्या जात आहेत. कायदा सुव्यवस्थेचा विचार करता, सर्व पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

अयोध्या खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्य सरकारला सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्रालयाने सर्वच महत्त्वाच्या राज्यांना एक पत्र पाठावले आहे. यामध्ये राज्यातील सुरक्षा वाढवण्यास सांगितले आहे. काही ठिकाणी अधिक सुरक्षा पुरवण्यात यावी, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

राम जन्मभूमी आणि बाबरी मशीदीचा हा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. गेल्या ४० दिवसात या प्रकरणात जलद सुनावणी झाली. १६ ऑक्टोबरला या प्रकरणाचा निकाल सुरक्षित ठेवण्यात आला. सरन्यायाधीश रंजन गोगोई हे निवृत्त होत असल्यामुळे १८ नोव्हेंबर म्हणजेच सोमवारपासून शरद बोबडे हे सरन्यायाधीशपदाची सूत्र स्वीकारणार आहेत. देशातील विविध मुस्लीम तसेच हिंदू संघटनांकडून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जो येईल त्याचे स्वागत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ठिकठिकाणी बैठका घेऊन संघटनांच्या प्रमुखांना शांतता ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.