अर्धवट बांधकाम असताना प्राणप्रतिष्ठेची घाई का? राम मंदिर निर्माण समितीच्या अध्यक्षांनी केला खुलासा

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : प्रभू रामावर राजकारण सुरु आहे का? रामावर श्रद्धा ठेवणाऱ्यांवर राजकारण केलं जातंय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Updated: Jan 18, 2024, 05:15 PM IST
अर्धवट बांधकाम असताना प्राणप्रतिष्ठेची घाई का? राम मंदिर निर्माण समितीच्या अध्यक्षांनी केला खुलासा title=

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त जवळ आला आहे. 22 जानेवारीला राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. यापार्श्वभूमीवर प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. दुसरीकडे देशातील 4 पिठाच्या शंकराचार्यांनी या सोहळ्याकडे पाठ फिरवल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. मंदिराचे बांधकाम अद्याप पूर्ण न झाल्याने आताच प्राणप्रतिष्ठा करणे योग्य नसल्याची भूमिका शंकराचार्यांनी मांडली आहे. ही पूजा धर्म शास्त्राच्या विरोधात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या विधानावर भाजप विरोधकही एकवटले असून पंतप्रधान मोदींवर टीका केली जात आहे. दरम्यान राम मंदीर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी यावर खुलासा केलाय. काय म्हणाले नृपेंद्र मिश्रा? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

राम मंदीराचे बांधकाम अपूर्ण असताना बांधकामाची घाई का? असा प्रश्न भाजप विरोधक विचारत आहेत. कॉंग्रेसने या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय. हा कार्यक्रम म्हणजे निव्वळ राजकारण असल्याचा आरोप करण्यात आलाय.  नृपेंद्र मिश्रा यांनी यावर एएनआयशी बोलताना याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. नृपेंद्र मिश्रा हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जवळचे मानले जातात. 

प्रभू रामावर राजकारण सुरु आहे का? रामावर श्रद्धा ठेवणाऱ्यांवर राजकारण केलं जातंय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राम मंदिरावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ही ऐतिहासिक घटना असल्याचे नृपेंद्र म्हणाले. आमच्या आस्थेचा सन्मान करण्यात आला, अधिकारांना मान्यता देण्यात आली, अशी भावना रामभक्तांमध्ये असल्याचे नृपेंद्र मिश्रा म्हणाले. पूर्वीच्या काळी, मंदिरे पूर्ण व्हायला कधी-कधी 50 वर्षे किंवा त्याहून अधिक वेळ लागायचा पण तेथे  तेथे देवाची स्थापना झाली नाही किंवा तेथे पूजा केली गेली नाही, असा त्याचा अर्थ होत नाही. सत्य परिस्थिती समजून घेण्याचा हा प्रयत्न असल्याचे नृपेंद्र म्हणाले.  

हा देश सर्वांचा

जय-पराजय अशी भावना नसावी, असे पंतप्रधान म्हणाले होते. न्यायालयीन निर्णय आपण सर्वांनी मान्य केला पाहिजे. प्रत्येकाने सावध रहा जेव्हा तुम्ही हा दिवस साजरा करता तेव्हा इतर कोणत्याही धर्माच्या व्यक्तीला या देशासाठी तो कमी महत्त्वाचा आहे हे दाखवण्यासाठी हा दिवस साजरा करू नका. हा देश सर्वांचा आहे, असे आवाहन नृपेंद्र मिश्रांनी केले. 

रामललाचे मंदिर पूर्णच

राम मंदिर बांधले आहे. रामललाच्या मंदिरात गर्भगृह, पाच मंडप आणि मंदिर तळमजल्यावर असेल. ते मंदिर बनले आहे. बांधकाम सुरू असलेल्या पहिल्या मजल्यावर ‘राम दरबार’ असेल. तेथे रामललासोबत, सीता त्यांचा भाऊ आणि परम सेवक हनुमान असतील. दुसऱ्या मजल्यावर फक्त 'विधी' असतील. त्यामुळे पाहायला गेलो तर एक प्रकारे रामललाचे मंदिर पूर्ण झाले आहे, असे मिश्रा म्हणाले.