कोणालाही न घाबरता, निष्पक्षपणे आपले कर्तव्य बजावेन- सरन्यायाधिश गोगोई

आपल्यावर झालेल्या लैंगिक शोषणांच्या आरोपाचे भारताचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी खंडन केले आहे.  

Updated: Apr 21, 2019, 08:28 AM IST
कोणालाही न घाबरता, निष्पक्षपणे आपले कर्तव्य बजावेन- सरन्यायाधिश गोगोई  title=

नवी दिल्ली : आपल्यावर झालेल्या लैंगिक शोषणांच्या आरोपाचे भारताचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी खंडन केले आहे.  न्यायालयातील एका माजी कर्मचारी महिलेने शुक्रवारी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. न्यायपालिकेचे स्वातंत्र्य धोक्यात असून ते अस्थिर करण्यासाठी मोठी षढयंत्र रचले जात असल्याचे सरन्यायाधिश गोगोई यांनी म्हटले. आरोप करणाऱ्या महिलेने २२ पानांच्या एका प्रतिज्ञापत्रावर तिचे म्हणणे मांडले. ती कनिष्ठ न्यायालयात सहाय्यक म्हणून काम करत होती. महिलेने केलेल्या आरोपानुसार, सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात १० आणि ११ तारखेला राहत्या घरातल्या ऑफिसमध्ये तिचे लैंगिक शोषण केले. 

न्यायपालिकेची प्रतिमा मलिन न होण्यासाठी संयम, जबाबदारी आणि बुद्धिमत्तेतून काम करण्याचे आवाहन प्रधान न्यायाधिश गोगोई, न्यायाधिश अरुण मिश्रा आणि न्यायाधिश संजीव खन्ना या त्रिसदस्यीय पीठाने केले. जोपर्यंत माझा कार्यकाळ पूर्ण होत नाही तोपर्यंत मी इथे राहीन आणि कोणालाही न घाबरता, निष्पक्षपणे आपले कर्तव्य बजावेन असे सरन्यायाधिश गोगोई यांनी म्हटले.

काय केले आरोप ?

'रंजन गोगोई यांनी माझ्या कंबरेला विळखा घातला आणि माझ्या संपूर्ण शरीराला नकोसे स्पर्श केले. मला घट्ट पकडून गैरवर्तन केले. मी स्वत:ची सुटका करुन बाहेर जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी मला सोडले नाही' असे या ३५ वर्षीय महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले होते. ऑक्टोबरमध्ये ही घटना घडल्यानंतर डिसेंबर महिन्यात या महिलेला सेवेतून काढून टाकण्यात आले. सेवेतून बरखास्त करण्यासाठी तीन कारणे देण्यात आली होती. त्यापैंकी एक कारण होते, तिने परवानगीशिवाय एक दिवस सुट्टी घेतली होती. आपला छळ इथेच थांबला नाही तर दिल्ली पोलिसांत कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असणारा पती आणि पतीचा भावाला २८ डिसेंबर २०१८ मध्ये तडकाफडकी निलंबित करण्यात आल्याचा दावाही या महिलेनं केला आहे. 

मार्च २०१९ मध्ये एका खोट्या तक्रारीत आपल्याला अडकावण्यात आले आणि एका दिवसासाठी तुरुंगातही टाकण्यात आल्याचे या महिलेने म्हटले. तिच्या म्हणण्यानुसार, नवीन नावाच्या एका व्यक्तीनं माझ्यावर सर्वोच्च न्यायालयात नोकरी लावण्याच्या बहाण्यानं ५० हजार रुपयांची लाच मागण्याचा आरोप केला होता. अशावेळी लाच दिल्याप्रकरणी त्याच्यावरही गुन्हा दाखल व्हायला हवा होता परंतु, असं झाले नाही... आणि तिला कोर्टाकडून जामीनही नाकारण्याता आला. त्यामुळेच आपण हे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा निर्णय घेतल्याचे तिने यात म्हटले.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी मात्र आपल्यावरचे आरोप तात्काळ फेटाळून लावले. गोगोईच्या यांच्या सचिवांनी प्रसिद्ध केलेल्या एका ई-मेलमध्ये 'हे आरोप धादांत खोटे आणि अश्लाघ्य असून हा न्याय संस्थेला बदनाम करण्याचा डाव असल्याचा' दावा केला गेला. हे एक मोठं षडयंत्र असल्याचेही त्यांनी म्हटले.