मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या झाली आहे, राहुल गांधी संतापले; लोकसभेत अभुतपूर्व गदारोळ

Rahul Gandhi in Lok Sabha: लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरु असून, राहुल गांधी आज या चर्चेत सहभागी झाले. राहुल गांधी यांनी यावेळी केंद्र सरकारवर टीका केली. तसंच भारत जोडो यात्रेतील अनुभव सांगितले.   

शिवराज यादव | Updated: Aug 9, 2023, 12:59 PM IST
मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या झाली आहे, राहुल गांधी संतापले; लोकसभेत अभुतपूर्व गदारोळ title=

Rahul Gandhi in Lok Sabha: लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरु असून, राहुल गांधी (Rahul Gandhi) आज या चर्चेत सहभागी झाले. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) पुन्हा एकदा खासदारकी बहाल केल्यानंतर राहुल गांधी सभागृहात दाखल झाले. राहुल गांधी यांनी यावेळी केंद्र सरकारवर टीका केली. तसंच भारत जोडो यात्रेतील अनुभव सांगितले. दरम्यान, भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी आज आपण अदानीवर बोलणार नाही असा टोला त्यांनी लगावला. आज माझ्या भाजपाच्या मित्रांना घाबरण्याची गरज नाही असंही ते म्हणाले. मणिपूरमध्ये यांनी हिंदुस्थानची हत्या केली आहे. यांच्या राजकारणाने हिंदुस्थानला मारुन टाकलं आहे अशा शब्दांत राहुल गांधी यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. 

"आज मी अदानींवर काही बोलणार नाही. गेल्यावेळी मी बोललो तेव्हा तुम्हाला त्रास झाला. पण आज माझ्या भाजपा मित्रांना घाबरण्याची गरज नाही. आज माझं मुख्य भाषण अदानींवर नसणार आहे. जे शब्द मनातून येतात ते मनाकडे पोहोचतात, त्यामुळे आज मी डोक्याने नाही तर मनाने बोलणार आहे. आज मी तुमच्यावर हल्ला करणार नाही," असं राहुल गांधी यांनी सांगितलं. 

"गेल्यावर्षी 130 दिवसांसाठी मी भारताच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत गेलो. पण भारत यात्रा अद्याप संपलेली नाही. मी लडाखलाही जाणार आहे.  अनेकांनी मला यात्रेदरम्यान, यात्रेनंतर मला माझं लक्ष्य काय आहे अशी विचारणा केली. सुरुवातील मला उत्तर देणं जमायचं नाही, कदाचित मलाच ही यात्रा का सुरु केली हे माहिती नव्हतं. कदाचित मला भारत पाहायचा होता. तो समजून घ्यायचा होता. ज्या गोष्टीवर माझं प्रेम होतं, ज्याच्यासाठी मी मरण्यास तयार आहे. ज्यासाठी मी मोदींच्या जेलमध्ये जाण्यास तयार आहे. ज्यासाठी मी 10 वर्षं रोज शिव्या खाल्या ती गोष्ट मला समजून घ्यायची होती. हे काय आहे ज्याने माझ्या मनाला पकडून ठेवलं होतं ते समजून घ्यायचं होतं," असं राहुल गांधींनी सांगितलं. 

"मी रोज 8 ते 10 किमी धावतो. जर मी 10 किमी धावू शकतो तर 25 किमी चालणं फार कठीण नाही असं मला वाटलं होतं. आज मी त्याकडे पाहिलं तर तो अहंकार होता. हे मी करु शकतो, हे काहीच नाही. त्यावेळी माझ्या मनात अहंकार होता, पण भारत अहंकाराला संपवून टाकतो. पण लगेच माझ्या गुडघ्यात दुखू लागलं होतं. जो लांडगा होता ती मुंगी झाली होती. सगळा अहंकार संपला होता," असं राहुल गांधी म्हणाले. 

"भारत एक आवाज आहे. जर हा आवाज ऐकायचा असेल तर अहंकार, द्वेष संपवायला हवा. काही दिवसांपूर्वी मी मणिपूरला गेलो होते. पण पंतप्रधान अद्याप गेलेले नाहीत. त्यांच्यासाठी मणिपूर भारतात नाही. मणिपूर आता वाचलेलाच नाही. आता त्याचे दोन भाग झाले असून, विभाजन झालं आहे. मी मणिपूरमधील मदत छावणीत महिलांशी, मुलांशी बोललो, जे पंतप्रधानांनी अद्याप केलेलं नाही," अशी टीका राहुल गांधींनी केली. यावेळी सत्ताधारी खासदारांचा गदारोळ सुरु होता. या गदारोळात राहुल गांधींचं भाषण सुरु होतं. 

"एका महिलेने मला सांगितलं की, माझा एकच मुलगा होता. माझ्या डोळ्यांसमोर त्याला गोळी घातली आहे. मी रात्रभर त्याच्या मृतदेहासह झोपली होती. नंतर मला भीती वाटू लागली. मी माझं घर आणि सगळं सोडून दिलं. तिने फक्त तिचे कपडे सोबत आणले होते. यानंतर एक फोटो काढला आणि एवढाच राहिला आहे असं सांगितलं," अशी माहिती राहुल गांधींनी दिली. राहुल गांधींनी यावेळी सत्ताधारी खासदारांना हे ऐकताना आपल्या मुलांचा विचार करा सांगितलं. 

#WATCH | Congress MP Rahul Gandhi says, "A few days back, I went to Manipur. Our PM didn't go, not even to this day, because for him Manipur is not India. I used the word 'Manipur' but the truth is that Manipur does not remain anymore. You have divided Manipur into two. You have… pic.twitter.com/QodCZnLHWs

पुढे ते म्हणाले "दुसऱ्या एका छावणीत महिला समोर आली असता मी तिला काय झालं तुमच्यासोबत असं विचारलं. मी हा प्रश्न विचारताच ती थरथर कापू लागली आणि बेशुद्ध झाली. यांनी मणिपूरममध्ये यांनी हिंदुस्थानची हत्या केली आहे. यांच्या राजकारणाने हिंदुस्थानला मारुन टाकलं आहे".

"मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली आहे. आपण देशद्रोही आहात. तुम्ही देशप्रेमी, देशभक्त अजिबात नाही. म्हणूनच तुमचे पंतप्रधान मणिपूरमध्ये जाऊ शकत नाहीत. तुम्ही भारतमातेचे रक्षक नाही, तर हत्यारे आहात," असा संताप राहुल गांधी यांनी व्यक्त केला. दरम्यान लोकसभा अध्यक्षांनी भारतमातेसंबंधी आदराने बोलावं असा सल्ला दिला. त्यावर राहुल गांधींनी आक्षेप घेतला. 

"भारतमाता माझी आई आहे. एक आई इथे बसली आहे आणि दुसऱ्या आईला तुम्ही मणिपूरमध्ये मारलं आहे. जोवर तुम्ही हिंसा बंद करत नाही तोवर तुम्ही माझ्या आईची हत्या करत आहात. लष्कर एक दिवसात मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करेल. पण तुम्ही तसं करु इच्छित नाही. जर नरेंद्र मोदी हिंदुस्थानचा आवाज ऐकत नसतील तर कोणाचा आवाज ऐकतात. ते फक्त दोन लोकांचा आवाज ऐकतात," असा आरोप राहुल गांधी यांनी केली. 

राहुल गांधी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना रावणाशी केली. राहुल गांधी म्हणाले की, "रावण फक्त दोन कुंभकर्ण आणि मेघनाद यांचं ऐकत होता. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त अमित शाह आणि अदानी यांचंच ऐकतात. लंकेला हनुमानाने नाही, तर रावणाच्या अहंकाराने जाळलं होतं. प्रभू श्रीरामाने रावणाला मारलं नाही, तर त्याच्या अहंकाराने त्याला मारलं. तुम्ही संपूर्ण देशात केरोसिन फेकत आहात. मणिपूरमध्ये केरोसिन फेकलं आणि काडी ओढली. आता तुम्ही हरियाणातही तेच करत आहात. तुम्ही संपूर्ण देश जाळत आहात".