तंबाखू खाऊन रस्त्यात थुंकताय ? २८ राज्यांनी घेतलाय कठोर निर्णय

 महाराष्ट्र सहित २८ राज्यांनी यासंदर्भात कठोर निर्णय घेतलाय

Updated: May 12, 2020, 07:42 AM IST
तंबाखू खाऊन रस्त्यात थुंकताय ? २८ राज्यांनी घेतलाय कठोर निर्णय  title=

मुंबई : देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी वाढवावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली. दरम्यान लॉकडाऊनचा निर्णय राज्य पातळीवर घेण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. दरम्यान कोरोना संकटातून वाचण्यासाठी राज्य पातळीवर अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात येत आहे. रस्त्यावर थुंकणे ही देखील मोठी समस्या कोरोना काळात जाणवत आहे. त्याममुळे महाराष्ट्र सहित २८ राज्यांनी यासंदर्भात कठोर निर्णय घेतला आहे. 

हे वाचा : लॉकडाऊन वाढवण्याच्या बाजुने किती राज्य ? पंतप्रधानांकडे केली मागणी

सार्वजनिक स्थळांवर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, सेवन आणि थुंकण्यासंदर्भातील निर्णय अधिक कठोर करण्यात आले आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, आसामसहित २८ राज्यांनी सार्वजनिक स्थळावर तंबाखूजन्य पदार्थ विक्री, सेवन आणि थुंकण्यावर बंदी आणली आहे.

याचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे केंद्रीय आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले आहे. १ एप्रिलपासूनच हा निर्णय लागू करण्यात आलाय.

मुख्य सचिवांना पत्र 

तंबाखू उत्पादन, पान मसाला आणि सुपारी खाणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे लोकं रस्त्यात कुठेही थुंकतात. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे आरोग्य तज्ञांनी केंद्राच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

या कठीण काळात तंबाखू सेवन सोडा असे आवाहन देखील करण्यात येतंय. धुम्रपान छातीच्या कार्यक्षमतेवर परिणाम करत असल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. यामुळे कोरोनाचा धोका अधिक वाढत असल्याचे तज्ञ सांगतात.

सर्वाधिक आकडा 

देशात कोरोनाबाधितांचा आकडा ६७ हजारांवर पोहचला आहे. भारतात गेल्या २४ तासांत ४२१३ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतचा एका दिवसातील हा सर्वात मोठा आकडा आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढून ६७ हजार १५२ झाली आहे. गेल्या २४ तासात ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. 

देशात २० हजार ९१६ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर आतापर्यंत २२०६ जणांचा मृत्यू झाला आहे. 

कोरोना रुग्णांचा संख्या दिवसागणिक वाढत असताना, दिलासादायक बाब म्हणजे रिकव्हरी रेट वाढून तो ३१.१ टक्क्यांवर पोहचला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.